ज्ञानेश्वर चव्हाण सांगतो की, “पूर्वी पारंपरिक पिकांमधून फारसा नफा मिळत नव्हता. मेहनत खूप पण उत्पन्न कमी असायचं. त्यामुळे मनात अस्वस्थता होती. एका मित्राने झेंडू शेतीचा सल्ला दिला आणि मी प्रयोग म्हणून एका एकरावर झेंडू लावला. पहिल्याच वर्षी चार लाखांचा नफा झाला आणि तिथून माझं आयुष्यच बदललं.” या निर्णयानंतर ज्ञानेश्वरने पूर्णपणे झेंडू शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
त्याच्या शेतीत आज आधुनिक पद्धतीने झेंडूची लागवड केली जाते. योग्य अंतर ठेवून रोपांची लागवड, सेंद्रिय खतांचा वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत — या सर्व उपाययोजनांमुळे उत्पादनात सातत्य राखले जाते. झेंडूचे फुलांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि फुलांची दीर्घकाळ टिकणारी क्षमता यामुळे व्यापाऱ्यांमध्ये त्याच्या झेंडूला मोठी मागणी आहे.
ज्ञानेश्वर सांगतो, “मी माझा माल थेट बांधावरून विकतो. मुंबई, पुणे, संभाजीनगर, लातूर, हैदराबाद आणि नागपूरसारख्या शहरांतून व्यापारी थेट माझ्या शेतावर येतात आणि झेंडू खरेदी करून नेतात. त्यामुळे मला बाजारात जाण्याची गरजच पडत नाही.” या थेट विक्री पद्धतीमुळे त्याला वाहतूक खर्च, दलालांची कमिशन आणि वेळेचा अपव्यय या सर्वांपासून दिलासा मिळतो.
ज्ञानेश्वर चव्हाण याची ही यशोगाथा आज मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीतून उत्पन्न मर्यादित असलं तरी नव्या पिकांचा स्वीकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेशी थेट संपर्क — हे घटक आत्मसात केल्यास शेतीतून मोठं उत्पन्न मिळवता येतं, हे ज्ञानेश्वरच्या उदाहरणातून स्पष्ट होतं. बीड जिल्ह्यातील हा तरुण शेतकरी आज अनेकांसाठी यशाचा नवा मार्ग दाखवत आहे.