बीड : फळबागांमधून आता शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवतात. फळांना बाजारात रोजची मागणी असते, त्यामुळे हंगामी आणि बारमाही दोन्ही फळांमधून चांगली कमाई होते. मोसंबीलासुद्धा बाजारात मोठी मागणी असते. हे फळ चवीला स्वादिष्ट लागतंच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असतं.
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कलंत्री बाग विशेषतः मोसंबी पिकासाठी ओळखली जाते. या पिकाला केवळ राज्यभरातच नाही, तर इतर राज्यांमधूनही मोठी मागणी मिळते. जयप्रकाश कलंत्री हे या बागेचे मालक आहेत. ते बागेतला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे ताजी फळं मिळाल्यानं ग्राहक समाधानी होतात आणि कलंत्री यांची चांगली कमाई होते.
advertisement
थेट बांधावरून फळविक्री होत असल्यामुळे या मोसंबीला ग्राहकांकडून उत्तम मागणी मिळते. चहूबाजूंनी हिरवळ आणि मधोमध फळबाग अशी रचना असल्यामुळे ग्राहक या लागवडीचं तोंडभरून कौतुक करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून याठिकाणी मोसंबीचं पीक घेण्याची परंपरा कायम आहे. अलीकडे 3-4 वर्षांमध्ये तर कलंत्री यांनी आपल्या व्यवसायात जास्तीत जास्त वाढ केली.
जयप्रकाश कलंत्री हे मोसंबीच्या लागवडीतून प्रति हेक्टर कमीत कमी अडीच ते 3 लाख रुपयांचा नफा किरकोळ विक्रीतून मिळवतात आणि एकूण वार्षिक उत्पन्न पाहिलं तर त्यांना 15 ते 20 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. हा आकडा खरोखर मोठा असून त्यामागे कलंत्री यांची मेहनतही तेवढीच आहे. विशेष म्हणजे एकदाच केलेल्या गुंतवणुकीतून पुढील काही वर्षे या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो, असं जयप्रकाश सांगतात. शिवाय मोसंबीची लागवड आणि त्यासाठी लागणारा सुरूवातीचा खर्च सर्वसामान्यपणे झेपण्यासारखा असतो, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच मोसंबी पीक घेऊन शेतकऱ्यांनी उत्तम नफा मिळवावा, असं आवाहनदेखील जयप्रकाश कलंत्री यांनी केलं आहे.