जालना : महाराष्ट्र कृषी दिन! हरितक्रांतीचे जनक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आठवण म्हणून हा दिवस 1 जुलै रोजी संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातो. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आता शेतकरी बांधव पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्तम उत्पन्न मिळवू लागले आहेत. चांगल्या पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता, बियाणांची निवड, इत्यादी मूळ बाबी महत्त्वाच्या असतात. शिवाय बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावं लागतं. परिणामी आर्थिक तोटा सहन करावा लागतो. जालन्यातील 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धवराव खेडेकर यांनी याबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
advertisement
आपल्या राज्यात हलकी, मध्यम आणि भारी अशा तीनही प्रकारच्या जमिनी आढळतात. चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी सर्वात आधी जमिनीची निवड उत्तम करायला हवी. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार ओळखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तरच योग्य पिकाची निवड करता येते. त्याचबरोबर शेतकरी जमिनीत कोणती पोषकद्रव्य आहेत, किती प्रमाणात जमिनीची पोषण क्षमता आहे, याबाबतची माहिती कृषी तज्ज्ञांकडून घेऊ शकतात. जमिनीची उत्पादकता लक्षात आल्यावर पीक निवडणं सोपं होतं.
हेही वाचा : 'इथं' शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळतील सोयाबीन बियाणं! कुठं करावा अर्ज?
हलक्या जमिनीत कमी कालावधीत येणारी हलक्या प्रतीची पिकं निवडावी, त्यातून उत्पन्न कमी मिळू नये यासाठी रोपांची संख्या वाढवावी. तर, मध्यम जमिनीत त्याच पद्धतीची कमी कालावधीत येणारी पिकं घ्यावी आणि भारी जमिनीत मात्र जास्त पाण्याची आवश्यकता असलेली, जास्त कालावधीची पिकं जोमानं वाढू शकतात. मात्र यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.
महाराष्ट्रातील खरीप हंगाम प्रामुख्यानं पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतो. जर पावसात खंड पडला तर शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचं योग्य नियोजन करावं लागतं. अशावेळी पाणी जमिनीला द्यायचं की पिकांना द्यायचं हे ठरवावं. कारण पिकांच्या मुळांच्या कक्षेत पाणी देणं आवश्यक असतं. इथं ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती उपयुक्त ठरते. शेतकरी शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करू शकतात. तसंच जागतिक तापमानवाढ हादेखील भविष्यात एक मोठा मुद्दा समोर असेल. त्यामुळे जागतिक तापमानवाढीला प्रतिकार करता येईल अशा पीक पद्धतीची निवड शेतकऱ्यांनी करावी, असा सल्ला उद्धवराव खेडेकर यांनी सर्व शेतकरी बांधवांना दिला आहे.