तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्याकामी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे 15 टक्के घट होणार आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण 14 प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार आहे. बुधवार, दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून गुरूवार, दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात लागू राहणार आहे.
advertisement
संबंधित सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, या कालावधीत कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. दिनांक 3 डिसेंबर व 4 डिसेंबर 2025 रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
