सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा हा मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग (मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्ग (गोरेगाव) यांना थेट जोडणार आहे. प्रकल्प चार टप्प्यांत राबवण्यात येत असून त्यात उन्नत मार्ग, उड्डाणपूल आणि भूमिगत बोगद्यांचा समावेश आहे. विशेषतः तिसऱ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहत परिसरातून जाणारा 13 मीटर व्यासाचा दुहेरी भूमिगत बोगदा उभारण्यात येत आहे. सध्या गोरेगाव–मुलुंड उड्डाणपुलाचे सुमारे 48 टक्के काम पूर्ण झाले असून बोगद्याचे काम 18 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रस्तावित वर्सोवा–दहिसर सागरी किनारा मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल. तसेच दहिसर, मुलुंड आणि ठाणे दरम्यान प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या जोडमार्गाच्या कामासाठी जुलै 2029 ही मुदत निश्चित करण्यात आली असून 2026-27 च्या अर्थसंकल्पात सुमारे 2650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कामात झालेल्या दिरंगाईमुळे संबंधित कंत्राटदारावर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.






