होळी आणि धुलीवंदन या दोन्ही दिवसांना बंजारा समाजात विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे, इतर समाजांप्रमाणे होळीच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटवली जात नाही. बंजारा समाजात होळी प्रज्वलित करण्याची परंपरा धुलीवंदनाच्या दिवशी आहे. पहाटे दिवस उजाडण्यापूर्वीच सर्वजण एकत्र येऊन विधीपूर्वक होळी पेटवतात. या अग्निपूजनामागे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या विचारांचे स्वागत करण्याचा संदेश दडलेला आहे. या अनोख्या परंपरेमुळे बंजारा समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये अधिक ठळकपणे समोर येतात.
advertisement
धुलीवंदन हा दिवस बंजारा समाजात ‘धुंड’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी विशेषतः गेल्या बारा महिन्यांत जन्मलेल्या मुलांवर संस्कार करण्याची प्रथा आहे. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कुटुंबीय आणि समाज एकत्र येऊन विधी करतात. या संस्कारामागे मुलाने आयुष्यात योग्य मार्ग स्वीकारावा, चुकीच्या सवयींपासून दूर राहावे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश दिला जातो.
होळीच्या सणाची तयारी पंधरा दिवसांपासून ते एक महिन्यापूर्वीच सुरू होते. दररोज संध्याकाळी समाजातील लोक एकत्र जमतात. ‘लेंगी’ या पारंपरिक गाण्यांच्या माध्यमातून नृत्य-गायनाचा कार्यक्रम रंगतो. या गाण्यांमध्ये इतिहास, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचा उल्लेख असतो. तरुण-तरुणींपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात आणि वातावरण आनंदाने भारलेले असते.
बीड जिल्ह्यातील गोर सेनेचे पदाधिकारी रमेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी हा सण बंजारा समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या काळातही ही परंपरा जपत सण साजरा केला जातो, ही समाजातील ऐक्य आणि संस्कारांची जपणूक करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.





