मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झालं. आज गुरुवारी शोकाकुल वातावरणात बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. पण, राज्याचे उपमुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचा विमान अपघातात मृत्यू कसा होऊ शकतो? याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. विमान अपघाताच्या चौकशीबद्दलही मागणी होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना या घटनेबद्दल पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला आता उत्तर देण्यात आलं आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबद्दल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला नायडू यांनी उत्तर दिलं आहे.
"विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे, तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील' असं आश्वासन उड्डाण मंत्र्यांनी दिली.
"या प्रकरणाच्या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मोलाचे असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ' असंही त्यांनी पत्रात स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात काय केली होती मागणी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पत्र पाठवले होते. "अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात आणखी 4 जणांना मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी पत्रातून मागणी केली होती. भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशीही पत्रातून मागणीही फडणवीस यांनी केली होती.
