एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान, एसी उपनगरीय लोकलमध्ये विनातिकीट आणि अयोग्य तिकीट असलेल्या 91,000 प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यामुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये गडगंज रकमेची बरसात झालेली पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 2.97 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 49 टक्क्यांची वाढ झाली आहे. वातानुकूलित लोकलमधील फुकट्यांच्या संख्येत 97 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही कारवाई टीसींकडून थेट ट्रेनमध्ये चढून केली गेली होती.
advertisement
एकूणच, पश्चिम रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुंबई उपनगरीय लोकल, मेल/ एक्सप्रेस आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिमेद्वारे प्रवाशांकडून 155 कोटी 46 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली सुमारे 49 टक्क्यांनी जास्त आहे. त्यात केवळ मुंबई उपनगरीय विभागातून 41.26 कोटी रुपयांचा समावेश आहे. रेल्वे अधिकार्यांच्या मते, डिसेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनातिकिट प्रवाशांवर आणि कन्फर्म तिकिट नसतानाही चालू तिकिटांवरून आरक्षित डब्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
तर, डिसेंबर 2025 मध्येही 2.51 लाख तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 15.54 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत सुमारे ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये सुमारे 92,000 प्रकरणे आढळून आल्यानंतर आणखी 3.95 कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, तिकीट तपासणीमुळे विनातिकीट प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. एसी लोकलसह फर्स्ट क्लासच्या डब्यातही टीसींनी मोठ्या प्रमाणावर कामाच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी करावी, अशी मागणी अनेक तिकीट- पासधारक प्रवाशांनी केली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण दंडाच्या झालेली ही वाढ विनातिकिट प्रवाशांना आळा घालण्यासाठी, तिकिट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वेकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांना योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे आणि सर्व श्रेणीतील लोकलमध्ये अंमलबजावणी मोहीम सुरूच राहतील असा इशारा दिला आहे.
