मुंबई: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर आले आहेत. दादरचा चैत्यभूमी परिसर लाखो अनुयायांनी गजबजलेला आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संस्था देखील कार्यरत आहेत. अशीच एक संस्था आणि तिचे 3500 कार्यकर्ते गेल्या 9 वर्षांपासून मोठं काम करत आहेत. याबाबत लोकल18 ने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
दादरमधील ‘आम्ही आंबेडकरवादी’ ही संस्था गेले 9 वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे राज्यभरातील 3500 हून अधिक कार्यकर्ते असून ते या काळात बाबासाहेबांना अनोखी मानवंदना देतात. ‘आमची भूमी, स्वच्छ भूमी, चैत्य भूमी’ या उपक्रमातून हे आंबेडकर अनुयायी कार्यरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा त्यासोबतच शिवाजी पार्कमध्ये आजच्या दिवशी होणारा कचरा ते साफ करतात. तसेच चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना परिसरात कचरा न करण्याचा संदेश देतात.
चैत्यभूमीवरील महापरिनिर्वाण दिन, 'या' गोष्टी आहेत यंदाचे विशेष आकर्षण
बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
दादरमधील चैत्यभूमीत अनेक जण बाबासाहेबांना आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे मानवंदना देत आहेत. आम्ही आंबेडकरवादी ही संस्था सुद्धा तरुणांना प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमात सहभागी करून घेते. 2016-17 मध्ये हा उपक्रम सुरू झाला. तेव्हा केवळ 30 ते 40 जण एकत्र येऊन हा उपक्रम सुरू झाला. आता यात साडेतीन हजारांपर्यंत मुलं आणि कार्यकर्ते झाले आहेत. आम्ही कचरा उचलायला आलो नाही, तर कचरा होणार नाही याची दक्षता घेतोय, असं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
आम्ही कचरा उचलणार नाही
'आमची संस्था गेली नऊ वर्ष कार्यरत आहे. आम्ही कचरा करणाऱ्यांना नेहमीच आवाहन करतो की तुम्ही कचरा करूच नका, काही फेकायचं असल्यास कचराकुंडीचा वापर करा. जेणेकरून साफसफाई करण्याची किंवा कचरा उचलण्याची वेळ कोणावर येणार नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब यांना मानवंदना म्हणून अशा पद्धतीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.' असे आम्ही आंबेडकरवादी या संस्थेचे शंकर जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, आमचा हा उपक्रम पुढील काळातही कायम सुरू राहणार आहे. ‘आमची भूमी, स्वच्छ भूमी, चैत्य भूमी’ हेच आमचे ब्रीद असून त्यात मोठ्या संख्येनं लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.