मुंबई : रविवारच्या सुट्टीनंतर सोमवार यायलाच नको, असं अनेकजणांना वाटतं. शिवाय आठवड्याची सुरूवात असल्यानं या दिवशी वेळेत कामावर पोहोचणं आवश्यक असतं. परंतु मुंबई आणि ठाणेकरांसाठी मात्र 8 जुलैचा सोमवार हा एक चूकलेला दिवस ठरला. सकाळच मुसळधार पावसानं झाल्यामुळे वेळेचं पुढचं सगळं गणित कोलमडलं. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झालीच, शिवाय लोकल गाड्यांना पावसाचा मोठा फटका बसला.
advertisement
रात्रभर जोरदार कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागात लोकलच्या ट्रॅकवर पाणी आलं. याचा परिणाम गाड्यांवर झाला. मध्य रेल्वेचा खोळंबा झालाच, तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्याही उशिरानं धावत असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. लोकल आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
हेही वाचा : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला! मुंबईला पावसानं पुरतं झोडपलं, नागरिकांचे हाल
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ते ठाणे दरम्यान फक्त ठाणे ट्रेन चालवण्यात येत आहेत. सीएसटीपर्यंत जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दिवा, मुंब्रा, कळवा स्टेशनवर फास्ट लोकल थांबत नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
पाऊस सुरूच असल्यामुळे कधीपर्यंत रेल्वेगाड्या पूर्ववत होतील याबद्दल काही शाश्वती देण्यात येत नाहीये. शिवाय पुढचे 4 ते 5 तास धोक्याचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.