विरारमधील जीवदानी मंदिर नवरात्रोत्सवात लाखो भाविकांची वर्दळ असते. या मोठ्या गर्दीला लक्षात घेता मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला उच्च प्राथमिकता दिली आहे. मंदिर परिसरात 160 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर ठेवली जाईल. याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या घातपाताला थांबवण्यासाठी शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. या सर्व तयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी घेतला.
advertisement
जीवदानी देवीच्या दर्शनासाठी विविध राज्यांमधून भाविक येतात. ज्यामध्ये गुजरात, ठाणे, पालघर, भाईंदर, मुंबई, राजस्थान आणि कोकण येथील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा दहशतवादविरोधी पथकानेही घेतला आहे. यासाठी सुरक्षा कवच उभारण्यात आले आहेत. नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विवा महाविद्यालयाचे 200 एनसीसी विद्यार्थी आणि मंदिर ट्रस्टचे 100 सुरक्षा रक्षक कार्यरत असतील. याशिवाय हत्यारबंद पोलिसांची तुकडी मंदिराच्या परिसरात तैनात केली जाईल.
फेनिक्युलरची चाचणी यशस्वी झाली असून भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर 50 हजारांच्या आसपास भाविकांची गर्दी होईल आणि रविवारी ही संख्या लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आहे, असे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेत बदल
नवरात्रौत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेतील बदलांवरही विचार करण्यात आला आहे. गडावर येणाऱ्या भाविकांच्या गर्दीला लक्षात घेऊन प्रशासन वाहतूक मार्गात सुधारणा करणार आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक बदल केले जातील.