मुंबई: एका शब्दानं आख्खं आयुष्य बदलू शकतं, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेने अनोळखी रस्त्यांवर, उपाशीपोटी जगण्याचा संघर्ष केला. रायगडच्या गल्लीबोळांत भटकताना, तिला स्वतःचं नाव, गाव काहीच माहिती नव्हतं. पण एक शब्द उच्चारला आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं. ‘बदामी’ या एका शब्दानं चक्रं फिरली आणि 7 वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मुलीला लेकीला आपली आई सापडली. ही एखाद्या चित्रपटातील कथानकासारखीच घटना वाटेल. परंतु, ही कुण्या चित्रपटाची कथा नसून ही एक सत्यकथा आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पनवेल जवळील वांगणी गावामध्ये सोशल अँड एवेंजिकल असोसिएशन फॉर लव (SEAL) ही संस्था आहे. कर्नाटकातील बदामी येथील रहिवासी असलेल्या कस्तुरी पाटील (50 वर्षे) या महिलेला काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पाली परिसरातून SEAL या बेघरांसाठी काम करणाऱ्या आश्रयगृहात आणण्यात आले. त्यावेळी तिची अवस्था इतकी बिकट होती की, ती स्त्री आहे की पुरुष, हेही ओळखता येत नव्हतं. मात्र हळूहळू तिला थोडे बळ मिळालं आणि तिने आपलं नाव सांगितलं.
नवरा-बायकोच्या भांडणात सुचली आयडिया, सुरू केला व्यवसाय, आता कमाई लाखात!
या संस्थेच्या समाजसेवकांनी कस्तुरीला मदतीचा हात दिला आणि तिच्या विस्कटलेल्या आयुष्याला एक नवी दिशा दिली.
कस्तुरीचा हा प्रवास कसा होता हे SEAL आश्रमाचे सदस्य बीजू सॅम्युएल यांनी सांगितला आहे. SEAL संस्थेचे सदस्य बीजू सॅम्युएल म्हणाले, "आम्हाला कस्तुरीच्या कुटुंबाविषयी कोणतीही माहिती नव्हती. पण याच आठवड्यात तिने 'बदामी' असा शब्द उच्चारला. आमच्या काही कार्यकर्त्यांना माहीत होते की, बदामी हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे आम्ही तातडीने बदामी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि कस्तुरीचे फोटो त्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवले."
दोन तासांत सापडला परिवार!
"फक्त दोन तासांत बदामी पोलिसांनी आम्हाला माहिती दिली की, कस्तुरीच्या मुलीने म्हणजेच देवम्मा भिंगारीने सात वर्षांपूर्वी आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती आणि ती आजही आईच्या शोधात आहे. ही बातमी ऐकून आम्ही आनंदाने भारावलो," असे SEAL संस्थेचे सदस्य बीजू सॅम्युएल म्हणाले.
एक Video व्हायरल आणि पुरतं बदललं आयुष्य, 21 वर्षीय तरुणी करतेय बक्कळ कमाई!
कस्तुरी पाटील बेघर कशी झाली?
पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्तुरी मानसिकरित्या खचली. त्यामुळे तिने नवऱ्याचे घर सोडून बहिणीकडे राहायला सुरुवात केली. मात्र ती नैराश्यात गेल्याने अचानक घराबाहेर पडली आणि महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात येऊन पोहोचली. गेली सात वर्षे ती बेघर स्थितीत कचऱ्यातील अन्नावर किंवा दयाळू लोकांनी दिलेल्या तुकड्यांवर जगत होती. पाली परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी ही परिस्थिती पाहून SEAL संस्थेला माहिती दिली आणि संस्थेच्या मदतीने कस्तुरीला नवीन जीवन मिळाले.
आम्ही खूप आनंदी आहोत
कस्तुरी पाटीलच्या मुलीची सासू इरम्मा भिंगारी यांनी सांगितले, "माझ्या सुनेला आईबद्दल खूप काळजी वाटत होती. अखेर सात वर्षांनंतर आम्हाला ती सापडली, याचा आम्हाला फार आनंद आहे."
संस्थापक पास्टर फिलीप यांची मागणी
SEAL संस्थेचे पास्टर फिलीप म्हणाले, "गेल्या 25 वर्षांपासून आम्ही बेघर लोकांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या मदतीने हायटेक डेटाबेस तयार करावा, ज्यामुळे बेपत्ता लोकांचे बायोमेट्रिक्सच्या आधारे पुनर्मिलन सोपे होईल." दरम्यान, सात वर्षांनी आईला शोधू शकलेल्या देवम्मा भिंगारीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी ही घटना एका चमत्कारासारखीच आहे.