नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकारण चांगलंच चर्चेत आलं होतं. शिवसेना-भाजपनं महायुती म्हणून ही निवडणूक लढवली .मात्र महापौरपदासाठी आकड्यांचे खेळ जुळवताना दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केला गेला.
प्रचारादरम्यान भाजपकडून झालेल्या पैसेवाटपाचा शिवसेनेनं टोकाचा विरोध केला. त्यानंतर डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोयता हल्ला झाला..
निवडणूका झाल्या.... निकाल आला आणि अंबरनाथमधील राजकीय खेळीनं पोळलेल्या शिवसेनेनं मनसेला गळाला लावलं.अन् भाजपला धोबीपछाड दिला. कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार असं चित्र असताना दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल यांनी महापौरपदासाठी अर्ज भरलाय. तर भाजपच्या राहुल दामलेंनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलाय
advertisement
कल्याण डोंबिवलीचं महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती.मनसेसोबतच ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्यात शिवसेनेला यश आलं होतं. तर मनसेनंही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. या सर्व प्रयत्नांनंतर आता शिवसेनेला 5 वर्ष महापौर पद मिळालंय, भाजपला उपमहापौरपदावर समाधान मानावं लागलंय, ठाकरेंचे नॉट रिचेबल नगरसेवक हे शिवसेनेचं ट्रम्प कार्ड ठरले आहेत.
केडीएमसीमधील शिवसेना भाजपमधील वाद मिटलेला दिसत असला तरी तो कधीही उफाळून येऊ शकतो. कारण स्थायी समिती, इतर समित्या, निधी, कामं यावरुन शिवसेना भाजपा मध्ये वाद होणार महासभेत वादंग होणार पालिका आवारात डोकी फुटणार हे चित्र कल्याण डोंबिवलीकरांना पाहायला मिळणार यांत तिळमात्र शंका नाही
कुरघोडीच्या राजकारणात शिवसेनेला मनसेनं पाठिंबा
कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणात शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला. विरोधात निवडणूक लढवूनही मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं...मात्र आता शिवसेना आणि भाजपच कल्याण डोंबिवलीत एकत्र आल्यानं मनसेच्या पदरात नेमकं काय पडलं असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
कलगीतुरा आता थांबण्याची शक्यता
केडीएमसीसोबत ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौरपदावरुन महायुतीमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. त्यावरही अखेर तोडगा निघाला असून ठाणे आणि उल्हासनगरही शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलं असून त्याबदल्यात मुंबईचं महापौरपद भाजपनं स्वतःकडे ठेवलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा आता थांबण्याची शक्यता आहे.
