आईच्या जीवाची घालमेल सुरू झाली. नको त्या विचारांनी मनात घर केलं. मात्र तरीही आईचं मन सांगत राहील की एकदा तरी फोन उचलला जाईल, समोरुन हॅलोचा आवाज येईल अशी अपेक्षा तिला होती. एक मन सांगत होतं सारं काही संपलं आहे. मात्र तिने शेवटपर्यंत प्रयत्न करायचे सोडले नाहीत. कुटुंबियांनी नातेवाईकांनी तिला फोन केला, फोन मात्र वारंवार वाजत राहिला मात्र समोरुन कोणीच उचलला नाही.
advertisement
अवघ्या 20 वर्षांची असलेली नगंथोई शर्मा, एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 मध्ये फाइट अंटेडंट म्हणून होती. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाली. लंडनसाठी निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. विमानाने उड्डाण केले आणि 10 मिनिटातच कोसळले. मागे राहिले फक्त अवशेष, तुटलेले लोखंडी सांगाडे आणि आपल्या प्रियजनांना शोधणारे हताश चेहरे.
नगंथोईच्या कुटुंबाशी तिचं शेवटचं बोलणं टेकऑफच्या काही मिनिटे आधी झालं होतं. मी लंडनला जात आहे. लवकरच फ्लाइट टेकऑफ करेल. कदाचित काही काळ बोलणे शक्य होणार नाही. कुणाला माहीत होते की तिचा हा मेसेज हे शब्द कायमचे शेवटचे ठरतील. घटनेनंतर मणिपूरमधील थोउबल जिल्ह्यात असलेल्या शर्मा कुटुंबासाठी, प्रत्येक वाजणारा फोन आशा जागवत होता आणि त्याचबरोबर भीती आणखी वाढवत होती. तिचा फोन अनेक वेळा वाजला. इंटरनेट चालू आहे. सिग्नलही मिळत आहेत. याचा अर्थ काहीतरी आहे ना? असा समज कुटुंबियांचा होता.
आम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तिला कॉल करणे बंद केले. आम्हाला भीती होती की तिची बॅटरी संपू नये. पण जोपर्यंत ती रिंगटोन ऐकू येत होती, तोपर्यंत वाटत होते की ती कुठे तरी आहे. कदाचित वाट बघत असेल असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र कुटुंबियांच्या सगळ्या आशा मावळल्या. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला.
नगंथोई तीन वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. इम्फाळमध्ये आयोजित एका भरती मोहिमेत तिची निवड झाल्यानंतर ती मुंबईत स्थायिक झाली होती. तिथले जीवन तिला आवडू लागले होते. पण तिच्या मनात नेहमी एक भीती होती. ती नेहमी म्हणायची की, तिला विमान अपघाताची खूप भीती वाटते. ती म्हणायची, 'माहित नाही असे काही झाले तर मी काय करेन.' आज तिची तीच भीती तिच्या कुटुंबासाठी सर्वात मोठे दुःखद स्वप्न बनले आहे.
नगंथोई तिच्या कुटुंबातील मधली मुलगी होती. जबाबदार, समजूतदार आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी. तिला आकाश आवडत होते, पण त्याची भीतीही वाटत होती. एका मुलाखतीसाठी नशीब आजमावण्यासाठी निघालेली मुलगी जगाच्या अर्ध्या प्रवासासाठी उड्डाण करेल असे तिने कधीच विचारले नव्हते. आज, तेच कुटुंब तिच्याबद्दल कोणतीही बातमी मिळण्याच्या आशेने बुडाले आहे. दिल्ली आणि चंदीगडहून दोन नातेवाईक अहमदाबादला रवाना झाले आहेत. कदाचित तिला शोधू शकतील, ओळखू शकतील किंवा निदान सत्य तरी जाणून घेऊ शकतील, ते कितीही भयावह असले तरी.