२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी काळी ठरली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि त्यानंतर काही तासांतच जयपूर विमानतळावर एका मोठ्या विमान अपघाताची टांगती तलवार होती. एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना फेल झालं, ज्यामध्ये राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह १३५ प्रवासी स्वार होते.
जयपूरमध्ये काय घडला थरार?
advertisement
एअर इंडियाचे विमान (AI-1719) दिल्लीहून दुपारी १:०५ वाजता जयपूर विमानतळावर उतरणार होते. विमान लॅण्डिंग करणार होतं. अनस्टेबल अप्रोचमुळे वैमानिकाने लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. धावपट्टीला येताच विमानाने पुन्हा हवेत झेप घेतली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. प्रवाशांनी श्वास रोखला, हृदयाची धडधड वाढली. १० मिनिटे हे विमान जयपूरच्या आकाशात घिरट्या घालत होते आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळालं.
काय आहे गो-अराउंड?
तांत्रिक भाषेत जेव्हा वैमानिकाला लँडिंग सुरक्षित वाटत नाही, तेव्हा तो विमान पुन्हा हवेत उडवतो, यालाच 'गो-अराउंड' म्हणतात. हा एक सुरक्षा प्रोटोकॉल आहे जो आज मोठा अनर्थ टाळण्यासाठी कामी आला.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न
या घटनेच्या काही तास आधीच बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'लिअरजेट ४५' (Learjet 45) या विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात विमानाने पेट घेतला आणि अजित पवारांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित दादा आगामी बजेट आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते.
मृतांची नावे:
अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)
विदीप जाधव (सुरक्षा रक्षक, PSO)
कॅप्टन सुमित कपूर (पायलट)
कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट)
पिंकी माळी (क्रू मेंबर)
