या पाचही जणांची चौकशी केली असता घटनेच्या दिवशी २३ मे ला राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? याची सविस्तर माहिती समोर आली आहे. तसेच हत्येच्या काही मिनिटं आधी आरोपींनी राजाची हत्या करायला नकार दिला होता. आपण हत्या करणार नाही, असं त्यांनी सोनमला सांगितलं होतं. मात्र सोनमने ऐनवेळी डोकं चालवलं. ज्यामुळे मारेकरी राजाला मारायला तयार झाले?
advertisement
हत्येच्या आधी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच राजाची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी आपल्या शाळकरी मित्रांसोबत एका कॅफेत बैठक घेतली आणि इथेच राजाच्या हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं. यासाठी आरोपी प्रियकर राजने आपले मित्र आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहाण यांना कटात सामील करून घेतलं. यानंतर आकाश, आनंद आणि विशालने मिळून राजाची हत्या केली.
घटनेच्या दिवशी २३ मेला सोनम फोटो शूट करण्याच्या बहाण्याने राजाला घेऊन कोरसा परिसरात घेऊन गेली. हा सगळा डोंगराळ भाग असून या परिसरात लोकांची वर्दळ अत्यंत कमी असते. याठिकाणी जात असताना तिन्ही आरोपी हिंदीतून गप्पा मारत दोघांमध्ये मिसळले. मेघालयात हिंदी बोलणारे पर्यटक मिळाल्याने राजाही त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर सोनमने थकली असल्याचा बहाणा केला आणि ती पाठिमागे चालू लागली. तर तिन्ही आरोपी आणि राजा गप्पा मारत काही अंतर पुढे गेले.
ऐनवेळी आरोपींची माघार पण सोनमने चालवलं डोकं
काही वेळ डोंगर चढल्यानंतर मारेकऱ्यांनी सोनमशी संवाद साधला आणि आपण राजाची हत्या करणार नाही, असं सांगितलं. मारेकऱ्यांनी ऐनवेळी हत्या करण्यास नकार दिल्याने सोनम बिथरली. पण पुढच्याच क्षणी तिने डोकं चालवलं आणि मारेकऱ्यांना २० लाख रुपये देते अशी ऑफर दिली. सोनम एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने राजाच्या पॉकेटमधून १५ हजार रुपये काढले आणि आरोपीला दिले. पैसे बघून आरोपींचं पुन्हा मतपरिवर्तन झालं आणि ते राजाची हत्या करायला राजी झाले. काही अंतर दूर गेल्यानंतर तिघांनी मिळून राजाची हत्या केली.
सोनमने सिग्नल देताच राजावर झाले वार
तत्पूर्वी सोनमने राजाची हत्या करण्याचा सिग्नल दिला. निर्जनस्थळी कुणी नसल्याचं पाहून सोनमने ओरडून 'याला मारून टाका' अशी हाक दिली. सोनमने सिग्नल देताच राजासोबत गप्पा मारणाऱ्या आनंद, आकाश आणि विशालनं सोबत आणलेली हत्यारं काढली. तिन्ही जणांनी विशालच्या डोक्यात वार केले. काही कळायच्या आत हल्ला झाल्याने राजा स्वत:चा बचाव करू शकला नाही. घाव वर्मी लागल्याने राजा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर आरोपींनी राजाचा मृतदेह जवळच्या दरीत फेकून घटनास्थळावरून पळ काढला.