देशातील सर्वात जुनी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री संघटना ELCINA ने केंद्र सरकारकडे मदतीसाठी तातडीचं पत्र पाठवलं आहे. यामध्ये चीनने काही महत्त्वाच्या धातूंच्या निर्यातीवर घातलेल्या नव्या निर्बंधांमुळे 21,000 पेक्षा जास्त नोकऱ्या धोक्यात आल्याचा इशारा दिला आहे.
एप्रिल 2025 पासून चीनने टेरबियम आणि डिस्प्रोसियम या 'रेअर अर्थ मेटल्स'च्या निर्यातीवर परवानगी घेण्याचे नियम कठोर लागू केले. या धातूंचा उपयोग निओडिमियम मॅग्नेट्स (NdFeB Magnets) तयार करण्यासाठी होतो. हे मॅग्नेट्स म्हणजेच हेडफोन्स, इयरबड्स आणि स्मार्ट स्पीकर्ससारख्या डिव्हाइसेससाठी वापरले जातात. भारतात तयार होणाऱ्या बहुतांश ऑडिओ डिव्हाइसेससाठी हे मॅग्नेट लागतं आणि त्यासाठी चीनवरच अवलंबून असतात.
advertisement
आता चीनकडून हे मॅग्नेट मिळणं कठीण झाल्यानं कंपन्यांना हेच डिव्हाइसेस चीनमधून तयार करून आयात करावी लागत आहेत. याचा परिणाम म्हणजे भारतातील स्थानिक उत्पादन थांबत आहे आणि कामगारांची गरजही कमी होतेय. नोएडा आणि दक्षिण भारतात अशा कंपन्यांमध्ये सध्या 5,000 ते 6,000 थेट नोकऱ्या आणि 15,000 अप्रत्यक्ष नोकऱ्या आहेत, ज्या संकटात सापडल्या आहेत.
ELCINA चं म्हणणं आहे की भारत काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वतःचे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स बनवायला सुरुवात करत होता, तेव्हा ही मोठी गोष्ट होती. पण आता पुन्हा पूर्णपणे तयार वस्तू चीनमधून आयात करावी लागत असल्यामुळे आपल्याला मोठं नुकसान होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर सरकारला सुचवलंय की रेअर मेटल्सना सेमीकंडक्टर्ससारखंच महत्त्व द्यावं, R&D मध्ये गुंतवणूक वाढवावी आणि स्थानिक पातळीवरच मॅग्नेट्स तयार करण्यासाठी मदत करावी. या संकटावर लवकर उपाय न सापडल्यास 'आत्मनिर्भर भारत'चं स्वप्न पूर्ण होण्याऐवजी आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.