उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. लग्नाचा आनंद आणि उत्साह मनात घेऊन जाताना 11 जणांना काय माहित होते की पुढच्याच क्षणी त्यांच्यासोबत काय अनर्थ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ लोकांना घेऊन जाणारी एक अर्टिगा कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 7 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
advertisement
मझिला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसुमा गावातून भुप्पा पुरवा मोडजवळ ही दुर्घटना घडली. शाहाबादचे सीओ अनुज मिश्रा यांनी सांगितले की, पाली येथील पटियानीम येथील नीरजचे वऱ्हाड कुसुमा गावाला गेले होते. लग्नाहून परत येत असताना वऱ्हाडाच्या गाडीला हा अपघात झाला.
अपघातानंतर आसपासच्या लोकांनी आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारची काच तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जखमी लोकांना सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) शाहाबाद येथे दाखल केले, जिथे उपचारादरम्यान 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जखमींची प्रकृती गंभीर आहे, ज्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.