गृहमंत्री अमित शहा यांनी विमान दुर्घटना घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ' ही एक दुर्घटना आहे आणि अपघात कोणीही थांबवू शकत नाही. आग इतक्या वेगाने पसरली की वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या विमानात २४२ प्रवासी होते फक्त एक प्रवाशी वाचला आहे, मी त्याला भेटलो आहे. टेकऑफ नंतर एका मिनिटात, अहमदाबाद विमानतळापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर, हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं', अशी माहिती शाहांनी दिली.
advertisement
इंधनामुळे भडका उडाला
'विमानात १,२५,००० लिटर इंधन होतं. प्रचंड प्रमाणात इंधनामुळे आग इतकी भीषण झाली की, तात्काळ बचावकार्य जवळजवळ अशक्य झालं. अपघातानंतर लगेच सरकारने सर्व मदत पथकांना सतर्क केलं होतं. सर्वांनी मिळून बचावकार्य सुरू केलं. प्रवाशांच्या कुटुंबातील सदस्यांचे डीएनए घेण्याची प्रक्रिया १ तासात पूर्ण केली जाईल. परदेशी प्रवाशांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले जातील. गुजरातमध्येच १००० हून अधिक डीएनए चाचण्या कराव्या लागतील. विमान वाहतूक विभागाने तपास अधिक तीव्र केला आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की अपघात कोणीही थांबवू शकत नाही, असंही शाह म्हणाले.
'आम्हाला घटनेची माहिती १० मिनिटांत मिळाली'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-१७१ च्या दुःखद अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. हा संपूर्ण देशासाठी भावनिक क्षण आहे. केंद्र सरकारला अपघाताची माहिती १० मिनिटांत मिळाली, त्यानंतर त्यांनी तातडीने गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीची चौकशी केली आणि मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या, असंही त्यांनी सांगितलं.