एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पुणे विभागातून तब्बल 141 बसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. शिवाय अचानक प्रवासाची गरज पडणाऱ्या भाविकांसाठी 70 जादा बसची सोय करण्यात आली आहे. या बस 26 ऑगस्टपर्यंत धावणार आहेत. म्हणजेच या गणेशोत्सवात एकूण 211 बस पुण्यातून कोकणासाठी सुटणार आहेत.
advertisement
कोकणवासीय भाविक दरवर्षी गणपतीसाठी आपल्या गावी परतण्याचा बेत आधीच ठरवतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झालेल्या कुटुंबांकडून सामूहिक प्रवासाचे नियोजन केले जाते. साधारण 42 प्रवाशांचा एक ग्रुप तयार होतो आणि महिनाभर आधीच बुकिंग केले जाते. ग्रुप बुकिंगमुळे बस थेट गावापर्यंत पोहोचते, त्यामुळे प्रवाशांना स्थानिक प्रवासाचा त्रास सहन करावा लागत नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक बस बुक झाल्या असल्याने भाविकांचा उत्साह दिसून येतो आहे. एसटी प्रशासनाने मागणी वाढल्यास आणखी बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
गणेशोत्सवासाठी पुण्यातून सुटणाऱ्या लालपरींपैकी 20 बस गुहागरला, 18 चिपळूणला, 14 देवगडला, 12 सावंतवाडीत, 10 राजापूरला, 9 दापोलीला, तर 8 मालवणला जाणार आहेत. याशिवाय रत्नागिरी, सावर्डे, खेड, माणगाव, देवरुख, लांजा, साखरपा अशा कोकणातील अनेक गावांत या बसेस पोहोचतील.
गणेशोत्सवाच्या गर्दीचा आणि पुण्यातील वाहतूक कोंडीचा विचार करून एसटी प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणांहून बस सुटण्याची व्यवस्था केली आहे. स्वारगेट, पु. ल. देशपांडे उद्यान, निलयम टॉकीज, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल आणि कात्रज चौक या ठिकाणांहून बसेस सुटणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील निगडी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी येथूनही बस सोडल्या जातील.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नसून तो नात्यांचा आणि भावनांचा उत्सव आहे. रोजगार, शिक्षण किंवा कामानिमित्त बाहेर पडलेले लोक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आपल्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठी गावी परतण्यास प्राधान्य देतात. याच कारणामुळे या दिवसांत एसटी बससेवेची मागणी नेहमीच जास्त असते.






