पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचं वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी खुलासा केला आहे.
मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे.
advertisement
जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही, यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची जी मागणी असेल ते करायला तयार आहे. मी सात ते आठ वेळा लढलो आहे, त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही, असं वक्तव्य करून अजित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजित दादांच्या नेतृत्वात लढणार आहे. पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन, असं सुनील तटकरे म्हणाले.
(Maharashtra politics : बारामतीत आणखी एका पवारांची होणार एंट्री, अजितदादा घेणार का एक्झिट?)
विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. अवसान गळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळी टीका आमच्यावरती करत आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकींना सामोरे जाऊ आणि चांगलं घवघवीत यश मिळवू, असं म्हणत तटकरेंनी विरोधकांना टोला लगावला.
'अकाली आलेल्या प्रॉडक्टबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही. अजितदादांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना तसा प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाचं तसं उत्तर दिलं आहे स्वतःहून मुलाखतीमध्ये अजितदादांनी असं म्हटलं नाही. तुम्ही प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी होती त्या अनुषंगाने त्यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही कुणी दादांना आग्रह करण्याची आवश्यकता नाही बारामतीकरांचं प्रेम आणि विश्वास दादांवर आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अजितदादांचा सिंहाचा वाटप आहे. अजितदादा निवडणुकीला नक्की सामोरे जातील आणि अभूतपूर्व यश दादांना आणि आमच्या पक्षाला मिळेल, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.
