नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी जेवताना आदित्यला अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, खेतेपठार गावात पक्का रस्ताच उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. अखेर मायेपोटी आई सुनीता आणि आजी शारदा यांनी आदित्यला आपल्या पाठीवर घेतलं आणि डोंगरदऱ्याचा ४ किलोमीटरचा खडतर रस्ता पायी पार केला. तिथून पुढे दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचाराला उशीर झाल्याने या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
advertisement
खेतेपठार ते आमोंडी हा रस्ता वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात कच्चा रस्ता वाहून गेल्याने येथील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. "जर वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा आज जिवंत असता," अशी काळीज पिळवटून टाकणारी खंत वडील विकास घनकुटे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाने आणखी बळींची वाट न पाहता तातडीने रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
