सणासुदीच्या काळात अनेक नागरिक मूळ गावी किंवा पर्यटनस्थळी जात असल्याने शहरात रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात होतात. त्याचबरोबर महाविद्यालये, कंपन्या आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाही. परिणामी, रक्तपेढ्यांमधील साठा झपाट्याने कमी होतो. याचा फटका थॅलेसिमिया, कर्करोग, अपघातग्रस्त तसेच प्रसूतीसारख्या तातडीच्या रुग्णांना बसतो.
जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, सणासुदीच्या दिवसांत रक्तदान शिबिरे न झाल्याने रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटतो. शहरातील रुग्णालयांना दररोज सुमारे 1500 रक्तपिशव्यांची गरज असते, मात्र प्रत्यक्षात केवळ 700 ते 800 पिशव्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करणे अत्यावश्यक आहे.
advertisement
जनकल्याण रक्तपेढीत दरमहा सरासरी दोन हजार रक्तपिशव्यांचे संकलन होते. गेल्या महिन्यात संस्थेने 293 शिबिरांमधून एकूण 19 हजार 649 रक्तपिशव्यांचे संकलन केले, मात्र ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण घटून केवळ 1300 पिशव्या इतकेच राहिले आहे. सध्या दररोज सुमारे 80 ते 90 पिशव्यांची गरज असते.
पुणे शहर आणि परिसरात सध्या 780 पेक्षा जास्त रुग्णालये आणि 35 रक्तपेढ्या कार्यरत आहेत. सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने या सर्व केंद्रांना आवश्यक पुरवठा करणे कठीण ठरत आहे. डॉक्टरांच्या मते, रक्ताचा पुरवठा स्थिर राहावा यासाठी वर्षभर नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे.
दिवाळीनंतरही अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू न झाल्याने सुट्टीचा हंगाम संपलेला नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांवरील ताण वाढला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ येत आहे. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे. एका रक्तपिशवीतून तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे सर्व पुणेकरांनी सणानंतरच्या या टंचाईच्या काळात मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
