पुणे: दिवसभर उन्हातान्हात बसून दगडांना फोडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना बाजारात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत मागणी होती. पण अलीकडे त्या वस्तूंचा वापर खूप कमी झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तरी देखील हे लोक या वस्तू रात्रं- दिवस मेहनत करून बनवत असतात. एक वस्तू तयार करण्यासाठी त्याचा अख्खा दिवस जातो. दगड गोळा करण्यापासून, त्याला हाताने कोरून आकार देण्यापर्यंत आणि तयार वस्तू बाजारात विकण्यापर्यंत. एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी सरस्वती रोदरे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
सरस्वती रोदरे यांनी सांगितलं की, आमच्या पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आला आहे. पूर्वी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत होते. पण आता या व्यवसायातून आम्हाला महिन्याला 5 हजारसुद्धा मिळत नाहीत. दगड आणण्यापासून ते त्या दगडाला हातोडीने ठोकून त्यातून जात, तुळशी वृंदावन अशा विविध वस्तू तयार करायला एका वस्तूला पूर्ण एक दिवस जातो. त्या वस्तू तयार करून बाजारपेठेत दिवसभर उन्हातानात बसूनही ग्राहकांचा ओढा आता फारसा नसतो. कोणी घेतलं तरी खूप भाव करतात 400 रुपयांची वस्तू असेल तर 300 किंवा 250 पर्यंत मागतात. त्यामुळे एवढे कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळतच नाही.
ही कला आणि हा व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळणं आवश्यक आहे. त्याच्या मेहनतीनुसार योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, कारण एका वस्तूच्या मागे कित्येक तासांचं कष्ट दडलेलं असतं. स्थानिक पातळीवर प्रदर्शनं, सरकारी योजनांमधून मदत मिळाली तर या कलेला पुन्हा उभारी मिळू शकते. तेव्हाच ही परंपरा आणि कष्टाने जपलेली कला पुढे टिकून राहू शकते.