घटनेत मृत्यू झालेले सहा तरुण हे पुण्यातील उत्तमनगर परिसरातील असून, 17 नोव्हेंबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास कोकणात फिरायला निघाले होते. प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील अतिशय अवघड आणि अरुंद वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळले. एमएच 12 वाय एन 8004 या क्रमांकाची थार जीप इतक्या वेगाने आणि जोरात दरीत कोसळली की तिचे अवशेष दूरवर पसरले. त्यामुळे अपघात किती भीषण होता याची कल्पनाही करवत नाही.
advertisement
पुणे-मुंबई नव्हे आता या शहरात उभारणार नवं IT पार्क, डेडलाईन ठरली, 45000 जणांना मिळणार रोजगार
या दुर्घटनेत मृत झालेल्या साहिल गोठेची ही थार गाडी होती. त्याच्यासोबत असलेला ओमकार कोळी हा केवळ 18 वर्षांचा तरुण होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, हे सर्व मित्र सोमवारी रात्री साडेदीडच्या सुमारास फिरायला निघाले होते. ओमकारने घरच्यांना जिमला जातो असे सांगितले होते. त्याने शाळेची परीक्षा बाहेरून दिली होती आणि पुढे चांगले काम करून कुटुंबाला हातभार लावेल, अशी त्याच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. ओमकारला एक भाऊ आणि एक बहीण असून, या अचानक घटनेने संपूर्ण कुटुंब कोसळले आहे.
ओमकारच्या आजी कमल कोळी यांनी अश्रू दाबत सांगितले, दोन दिवस आम्ही फोन लावत बसलो, पण ते काही उचलत नव्हते. असा परत येईल कधी वाटलंच नव्हतं. मुलगा तरुण होता, उत्साही होता. घराला आधार होईल असं वाटत होतं. त्यांच्या आवाजातील वेदना परिसरातील प्रत्येकाला चटका लावून गेल्या.
या अपघाताची माहिती पसरताच रायगड आणि पुणे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक, पोलिस आणि अग्निशमन दलाने एकत्रित येऊन दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. ताम्हिणी घाटातील अवघड भूगोल, दरीची खोली आणि खडकाळ परिसरामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरले.
या दुर्घटनेनंतर ताम्हिणी घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळा आणि धुक्याच्या दिवसांमध्ये येथे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिकांनी रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. सहा तरुणांचा अकाली मृत्यू केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पुणेकरांसाठी असह्य आहे. आनंदासाठी निघालेला छोटासा प्रवास शेवटचा ठरेल, हे कोणालाच माहीत नव्हते.





