पीएमआरडीएकडून मेट्रोची दोन्ही दिशांनी वेगवेगळ्या टप्प्यांत चाचणी घेण्यात आली. तांत्रिक प्रणाली, सिग्नल यंत्रणा, वीजपुरवठा आणि सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करण्यात आली असून सर्व बाबी समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पुणेकर वेळ वाचणार! चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका, गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात
advertisement
या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे (सीएमआरएस) औपचारिक परवानगी मागण्यात आली आहे. सुरक्षा तपासणी आणि अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात काही स्थानकांदरम्यान सेवा सुरू करून पुढे संपूर्ण मार्ग खुला करण्याची योजना आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागाशी थेट जोडला जाणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही मेट्रो पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. एप्रिलमध्ये या मेट्रोचा शुभारंभ झाल्यास पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा सकारात्मक बदल दिसून येणार आहे.






