रस्त्यावर बसून भाजी विकणारे वनवे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल 1 लाख 13 हजार 740 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी स्वतः जाऊन सुपूर्द केला. या घटनेने शहरात तसेच राज्यभरात एकच कौतुकाचा सूर उमटला आहे.
advertisement
वनवे यांचा मदत करण्यामागील प्रवास देखील अत्यंत हृदयस्पर्शी आहे. ते शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरात महाराजांच्या पादुकांसमोर एक डबा ठेवलेला आहे. दररोज भाजी विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी शंभर रुपये ते या डब्यात साठवतात. वर्षानुवर्षे ही बचत चालू असून, नेमकी गरज पडेल त्या वेळी हा पैसा समाजासाठी खर्च करायचा, अशी त्यांची भूमिका आहे. कोरोनाच्या काळात देखील त्यांच्या आईने अशाच पद्धतीने साठवलेले 1 लाख रुपये गरजूंना मदतीसाठी दिले होते.
या प्रसंगी बोलताना चरण वनवे म्हणाले, आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने नेहमी शिकवले की, आपल्याकडील पैसा जर इतरांच्या उपयोगी आला नाही तर तो दुःखाचा डोंगर आहे. आईच्या या शिकवणीप्रमाणे मी हा वारसा पुढे चालवत आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी दररोज थोडे थोडे साठवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खारीचा वाटा उचलला आहे.
वनवे यांचे हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे आणि त्यागाचे उदाहरण आहे. स्वतः साध्या जीवनशैलीत जगणारे, रस्त्यावर भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब, समाजाच्या अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे सरसावते, ही गोष्ट समाजातील श्रीमंत वर्गालाही विचार करायला लावणारी आहे.
पूरग्रस्तांसाठी हा आर्थिक हातभार जरी लहान वाटला तरी त्यामागील त्याग मोठा आहे. कारण दिवसेंदिवस धावपळीत, किरकोळ नफा-तोट्यात भाजी विक्री करून थोडा थोडा पैसा साठवणे आणि तो संकटग्रस्तांसाठी दान करणे ही गोष्ट सहजसाध्य नाही. परंतु वनवे यांनी दाखवलेली माणुसकी दाखवते की खरी श्रीमंती ही पैशात नसून, मनाच्या उदारतेत आहे.
आजच्या भौतिकवादी युगात, जेव्हा अनेकजण स्वतःपुरतेच विचार करतात, तेव्हा चरण वनवे यांचे हे उदाहरण समाजासाठी चांगले उदाहरण ठरावे असे आहे. त्यांच्या या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केले की समाजातील प्रत्येक स्तरातील माणूस जर मदतीसाठी पुढे आला, तर कोणतेही संकट सहज पेलता येते.