पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. देहू गावातून महाराजांच्या पालखीचं 29 जून रोजी प्रस्थान झालं. यानिमित्तानं गावात जणू वैष्णवांचा मेळा भरला होता. श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म ज्या देहू गावात झाला तिथं जाऊन प्रत्येक वारकऱ्याचं मन अगदी प्रसन्न होतं. महाराज इथंच आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते. सव्वा चारशे वर्षे झाले असले तरी आजही तो वाडा जसाच्या तसा पाहायला मिळतो. तिथं जिजाबाई आणि तुकाराम महाराजांची नित्यनियमानं पूजा केली जाते.
advertisement
संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचं जन्मस्थान मंदिर आहे. इथं 500 वर्षे प्राचीन अशी तुकाराम महाराजांचे पंतु पांडुरंग बाबा यांनी मूर्ती बसवलीये. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे यात पांडुरंगाप्रमाणे कटेवर हात ठेवले आहेत. अशी मूर्ती इतर कुठंच पाहायला मिळत नाही.
हेही वाचा : Wari 2024: पुण्यात कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कुठले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
तर, इथं जे मंडप आहे ते 72 वर्षांपूर्वीचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी बांधून दिलेलं आहे. ही मूळ वास्तू आजही जशीच्या तशी पाहायला मिळते. इथं नित्यनियमानं पूजा आणि आरती केली जाते. जिजाबाईंची पूजा त्यांच्या पिढीतील सुना आणि तुकोबारायांची पूजा पुरुष मंडळी करतात.
'तुकाराम महाराजांपासून आमची ही दहावी पिढी आहे. ही सेवा आमच्या घराण्यात 14 वर्षांनी एकदा येते. यंदा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचं 375वं वर्ष आहे. त्यामुळेच आम्ही आमचं भाग्य समजतो की, आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळतेय', अशा भावना तुकाराम महाराजांचे दहावे वंशज विवेकानंद मोरे यांनी व्यक्त केल्या.