श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान समजले जाते. सांगलीच्या श्रीगणपती पंचायतनच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये चोर गणपती बसवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजवर सुरु आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवसांपूर्वी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
चोर गणपती का म्हणतात?
गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. परंतु, सांगलीत चार दिवसांपूर्वीच गणपतीचे आगमन होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. हा गणपती कोणालाही माहीत न पडता, कोणताही गाजावाजा न करता त्याची स्थापना केली जाते. म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये ही परंपरा मागील 200 वर्षांपासून सुरु आहे.
advertisement
Hartalika Vrat 2025: मिळेल सौभाग्य अन् होईल वंशवृद्धी, कशी असते हरितालिका व्रताची विधी?
असा बनवतात चोर गणपती
चोर गणपतीची मूर्ती बनवण्याची पद्धत देखील अनोखी आहे. ही मूर्ती माती किंवा धातूपासून नव्हे तर चक्क कागदी लगद्यापासून बनवली जाते. मूर्ती पर्यावरणपूरक असते. शिवाय मूर्तीचे जतन करून ती सुखरूप ठिकाणी ठेवली जाते.
चोर गणपती
श्री गणपती पंचायतन मधील स्थानिक पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पाच दिवसाचा आराधनेचा सोहळा असतो. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. प्रतिपदेला पहाटे चार वाजता पारंपरिक पद्धतीने चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. 200 वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती तशीच आहे. दरवर्षी रंगरंगोटीशिवाय तिला हात लावला जात नाही. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. भाविक-भक्तांना हात लावून दर्शन घेता येते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.
चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या इकोफ्रेंडली चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते.