नवी दिल्ली: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर रात्रीच्या अंधारात एअर स्ट्राईक करून तिथल्या तीन तरुण क्रिकेटपटूंची हत्या केली आहे. या भ्याड हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला असून, संपूर्ण क्रिकेटविश्वात संतापाची लाट पसरली आहे. पाकिस्तानकडून खेळाडूंनाच लक्ष्य बनवल्यानंतर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक चाहते आणि माजी खेळाडूंनी मागणी केली आहे की पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमस्वरूपी बंदी घालावी.
advertisement
अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी एशिया कप ट्रॉफी घेऊन गायब झाले होते. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत किताब जिंकला होता. मात्र भारतीय खेळाडूंनी नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर एशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या नकवी यांनी ती ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पलायन केल्याचं सांगितलं जातं. आजपर्यंत ती ट्रॉफी भारताकडे पोहोचलेली नाही.
अफगाणिस्तानच्या तरुण क्रिकेटपटूंची हत्या
अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतातील अरगुन जिल्ह्यात क्रिकेटर कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांची पाच इतरांसह हत्या करण्यात आली. हे खेळाडू प्रांताची राजधानी शराना येथे एक मैत्रीपूर्ण सामना खेळून परत येत होते. त्यावेळी हा हल्ला झाला. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत.
या निर्दयी हल्ल्यामुळे अफगाणिस्तानभर संताप उसळला आहे. लोकांमध्ये प्रचंड रोष असून सोशल मीडियावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर काढण्याची मागणी जोर धरतेय. जगभरातील लोक पाकिस्तानच्या या भ्याड आणि अमानुष कृत्याची निंदा करत आहेत.
या घटनेनंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. याआधी भारतानेही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला होता. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध शेवटची बायलेटरल मालिका 2012-13 मध्ये भारतात खेळली होती.
लोकांकडून पाकिस्तानवर बंदीची मागणी
अफगाणिस्तानने Tri-Series सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) नव्या संघाच्या शोधात आहे. एका बाजूला संपूर्ण जग क्रिकेटपटूंच्या मृत्यूने शोकमग्न असताना, पीसीबी मात्र मालिका रद्द होऊ नये म्हणून नवी टीम शोधण्यात व्यस्त आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान रावळपिंडी आणि लाहोरमध्ये होणार होती. पीसीबीने जाहीर केलं आहे की- परिस्थिती काहीही असो, ही मालिका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल.
या निर्दयी आणि असंवेदनशील भूमिकेमुळे लोक अधिक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर #BanPakistan हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, लोक पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.
आयसीसी आणि बीसीसीआयचा निषेध
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी पाकिस्तानच्या या कृत्याची तीव्र निंदा केली आहे. आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी पक्तिका प्रांतातील अरगुन आणि बरमल जिल्ह्यांतील हवाई हल्ल्यांत मृत्यू झालेल्या तीन अफगाण क्रिकेटपटूंच्या निधनाबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला.
जय शाह म्हणाले...
अफगाणिस्तानच्या तीन तरुण क्रिकेटपटू कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून यांच्या मृत्यूने मी अत्यंत दु:खी आहे. या खेळाडूंचे स्वप्न निरर्थक हिंसेमुळे तुटले. अशी प्रतिभा गमावणं ही केवळ अफगाणिस्तानचीच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटविश्वाची शोकांतिका आहे. आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि या हृदयद्रावक घटनेत शोक व्यक्त करणाऱ्या सर्वांसोबत एकजुटीने उभे आहोत.
पाकिस्तानची बेशरमी
या घटनेनंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका थक्क करणारी ठरली आहे. पीसीबीने स्पष्ट केलं आहे की, मालिका रद्द होणार नाही आणि अफगाणिस्तानच्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल. पीसीबी सध्या नेपाळ आणि यूएईसारख्या संघांशी संपर्कात आहे. तर त्यांची पहिली पसंती झिम्बाब्वे हा टेस्ट दर्जाचा संघ असणार आहे.
पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की-अफगाणिस्तान सहभागी झाला नाही तरी मालिका वेळेवरच खेळवली जाईल. आम्ही इतर बोर्डांशी चर्चा करत आहोत, लवकरच नव्या संघाची घोषणा करू.