घरचं मैदान हे भारतासाठी अभेद्य असा बालेकिल्ला होतं, पण गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाच्या कामगिरीला उतरती कळा लागली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारताचा पराभव झाला तर भारतीय चाहते स्वीकारत होते, पण आता घरच्या मैदानात होत असलेल्या पराभवामुळे गौतम गंभीर माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने तर टीम इंडियाचा पुढचा कोच कोण होणार? हेदेखील सांगून टाकलं आहे.
advertisement
गंभीरवर दबाव वाढला
'अर्थातच, दबाव वाढत आहे. यात काही शंका नाही. मागील काही काळात, जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात तर तुमचा पराभव निश्चित असायचा आणि कोणालाही वाईट वाटायचे नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये तुम्ही पराभव पत्करला होता; ते होणारच होते. पण भारतात पराभव स्वीकारार्ह नाही कारण तो तुमचा बालेकिल्ला आहे. दक्षिण आफ्रिकेने हा किल्ला तोडला आणि न्यूझीलंडने येऊन व्हाईटवॉश केलं', असं कैफ म्हणाला आहे.
गौतम गंभीरवरील वाढत्या शंकांवर मोहम्मद कैफने प्रकाश टाकताना व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव पुढे आले आहे. याव्यतिरिक्त, कैफने संकेत दिले की जर टेस्ट क्रिकेटमध्ये परिस्थिती लवकर सुधारली नाही तर मुख्य प्रशिक्षकपदासाठी लवकरच नवीन दावेदार येऊ शकतात. त्या नावांपैकी, व्हीव्हीएस लक्ष्मण हा सर्वात चर्चेत असल्याचं कैफने सांगितलं.
लक्ष्मणकडे अनुभव
व्हीव्हीएस लक्ष्मणकडे टेस्ट क्रिकेटचा अनुभव आहे, तसंच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि वेगवेगळ्या टीमचा प्रशिक्षकही राहिला आहे. बीसीसीआयने बदलाचा विचार केला तर लक्ष्मण टेस्ट प्रशिक्षक म्हणून गंभीरची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार असू शकतो, असा दावाही कैफने केला आहे. 'गंभीरवर दबाव वाढत आहे, म्हणूनच लक्ष्मणचं नाव पुढे येईल. प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये इतर नावंही आहेत', असं वक्तव्य कैफने केलं आहे.
भारतामध्ये प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया खुली आणि स्पष्ट नाही, जितकी ती असायला पाहिजे, यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होत आहे, अशी खंतही मोहम्मद कैफने व्यक्त केली आहे. अनेक अनुभवी माजी खेळाडू प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रशिक्षकांना अनेकवेळा मुलाखतीशिवाय नियुक्त केलं जातं, असं रोखठोक मत कैफने मांडलं आहे.
'जर आपण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आणि तो नाकारला गेला तर काय? माजी खेळाडूसाठी हे अपमानास्पद आहे. प्रत्येकवेळी पात्र व्यक्तीला नियुक्त केलं जातंच असं नाही. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने सितांशू कोटक आणि अभिषेक नायर यांना आणलं आणि बीसीसीआयने हे मान्य केलं', असं कैफ म्हणाला आहे.
'मला वाटते की पारदर्शकतेची गरज आहे. ज्यांनी एक लाख लोकांच्या गर्दीसमोर मॅच जिंकवून दिली आहेस त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पण त्याऐवजी 3-4 मॅच खेळलेले खेळाडू टीमचा भाग होतात. सितांशू कोटक टीममध्ये आले तेव्हा कोणतीही मुलाखत झाली नाही', असा आरोप कैफने केला आहे.
