कमबॅकमध्ये रोहित-विराट फेल
खरंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा 7 महिन्यांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करत असल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळीच टीव्ही लावला, पण पहिल्या तासाभरामध्येच भारतीय चाहत्यांची निराशा झाली. रोहित शर्मा 8 रनवर आणि विराट कोहली शून्य रनवर आऊट झाले. विराट पुन्हा एकदा ऑफ स्टम्पबाहेरचा बॉल खेळायला गेला आणि विकेट कीपरकडे कॅच देऊन बसला.
advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया बऱ्याच नवख्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरली आहे. 'ऑस्ट्रेलियाची सी टीम मैदानात असतानाही टीम इंडियाचा पराभव होत आहे', असं म्हणत चाहते गौतम गंभीरवर निशाणा साधत आहेत.
'टीम इंडियाने 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज गमावली, न्यूझीलंडविरुद्ध 36 वर्षांनंतर घरच्याच मैदानात टेस्ट सीरिज गमावली. घरच्या मैदानात 12 वर्षांनंतर टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाला, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सी टीमविरुद्धही वनडे सामना गमावला. अजित आगरकर आणि गौतम गंभीरच्या राज्यात तुमचं स्वागत आहे', अशी टीका सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
कुलदीप बेंचवर
मागच्या एका महिन्यात कुलदीप यादवने भारताला आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकवली, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळाली नाही. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल या दोघांचा हा निर्णयही अनेक क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. या सामन्यातून नितीश कुमार रेड्डीने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्यालाही चमक दाखवता आली नाही. बॅटिंगमध्ये रेड्डीने 11 बॉलमध्ये 19 रन केले तर बॉलिंगमध्ये त्याने 2.1 ओव्हरमध्ये 16 रन देऊन एकही विकेट घेतली नाही.
कृष्णालाही संधी नाही
पर्थची खेळपट्टी जगातली सगळ्यात जलद समजली जाते, तसंच ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर बाऊन्सही जास्त असतो. प्रसिद्ध कृष्णा हा त्याच्या उसळी मारणाऱ्या बॉलिंगसाठी ओळखला जातो, त्यामुळे पर्थची खेळपट्टी त्याच्या फायद्याची ठरली असती, तरीही प्रसिद्ध कृष्णाऐवजी हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.