दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजनंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिज झाल्यानंतर 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजवेळी टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग फॉर्ममध्ये आल्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे, पण तरीही टीम इंडियाचा कर्णधार एका खेळाडूच्या कामगिरीमुळे नाराज आहे.
advertisement
सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजनंतर मुरली कार्तिकसोबत बोलताना खेळाडूंच्या कामगिरीवर उघडपणे भाष्य केलं. 'टीम म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक गोष्ट योग्य केली. फक्त एकच गोष्ट आम्हाला करता आली नाही, ती म्हणजे बॅट्समन सूर्या आम्हाला सापडलाच नाही. तो कुठे तरी हरवला आहे, पण तो लवकरच जोमाने पुनरागमन करेल', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
मागच्या 13 ते 14 महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हा बॅटने संघर्ष करत आहे. मागच्या 22 टी-20 इनिंगमध्ये सूर्यकुमार यादवला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. सूर्यकुमार यादवचं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातलं अर्धशतक ऑक्टोबर 2024 साली आलं होतं. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा शनिवारी होणार आहे, पण त्याआधी सूर्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही सूर्या 5 रनवर आऊट झाला.
हार्दिकचा धमाका
पाचव्या टी-20 सामन्यात भारताने दिलेल्या 232 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 201/8 एवढा स्कोअर करता आला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहला 2, अर्शदीप आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 35 बॉलमध्ये 65 रन केले, याशिवाय डेवाल्ड ब्रेविसने 17 बॉलमध्ये 31 रनची खेळी केली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर सुरूवातीपासूनच भारतीय बॅटरनी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 25 बॉल 63 तर तिलक वर्माने 42 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. अभिषेक शर्माने 34 आणि संजू सॅमसनने 37 रन केले. सूर्यकुमार यादव 5 रन करून आऊट झाला.
