वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी निवड समितीने 23 नोव्हेंबरला भारतीय संघाची घोषणा केली. या स्क्वॉडमध्ये ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका 'ए' विरुद्धच्या अनधिकृत वनडे मालिकेत ऋतुराजने 3 मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त रन्स कुटले होते. त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत प्रत्येक बॉलवर प्रभुत्व गाजवले. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याला सिनिअर टीममध्ये स्थान मिळालं आहे.
advertisement
पृथ्वी शॉ याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा
ऋतुराजच्या निवडीचा थेट परिणाम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या महाराष्ट्र टीमवर झाला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) 21 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या संघात ऋतुराजकडे कॅप्टनसी सोपवली होती. मात्र, आता तो नॅशनल ड्युटीवर असल्याने साखळी फेरीतील सामन्यांसाठी पृथ्वी शॉ याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमसीएने जरी उपकर्णधाराचे नाव घोषित केलं नसलं, तरी पृथ्वीला गरज पडल्यास नेतृत्व करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या.
मुंबई सोडून महाराष्ट्र संघात
दरम्यान, पृथ्वी शॉ काही महिन्यांपूर्वीच मुंबई सोडून महाराष्ट्र संघाशी जोडला गेला आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटिंगची चुणूक दाखवत 7 डावांत तब्बल 470 धावा केल्या आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. आता टी-20 फॉरमॅटमध्येही पृथ्वीने अशीच आक्रमक कामगिरी करावी आणि टीमला विजय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा मॅनेजमेंटला असेल. त्यामुळे ऋतुराजच्या अनुपस्थितीत पृथ्वीला ही मोठी जबाबदारी मिळणं जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.
