बॅटिंगमध्ये मनमानी प्रयोग
गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून टीम इंडिया ऑलराऊंडर खेळाडूंवर जास्त अवलंबून राहिली आहे, जे शास्त्रींच्या मते टेस्ट क्रिकेटच्या मूलभूत रचनेशी सुसंगत नाही. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या खेळाडूंना महत्त्व प्राप्त झालेलं असताना सरफराजसारखे खेळाडू मागे पडत आहेत. टीम इंडियाची बदलेली ही रणनीती बॅटिंगच्या स्थिरतेला हानी पोहोचवत आहे, असं मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं आहे.
advertisement
टीम इंडियाने सीरिजच्या पहिल्या सामन्यात तीन स्पिनरना मैदानात उतरवले. तर तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेली. टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर स्पेशलिस्ट बॅटरची गरज असते, पण मागच्या काही काळात या क्रमांकावर संगीत खूर्चीचा खेळ सुरू आहे. कोलकात्यामध्ये 30 रननी पराभव झाल्यानंतर साई सुदर्शनला वगळण्याच्या निर्णयावरही मोठी टीका झाली.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियात बदल तर झाले, पण रणनीती मात्र तशीच राहिली. दुखापतग्रस्त शुभमन गिलऐवजी साई सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, पण ऑलराऊंडरवरचा विश्वास कायम राहिला. अक्षर पटेलच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली गेली. तर पहिल्या टेस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला सुंदर या सामन्यात आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. या निर्णयामुळे बॅटिंगचा क्रम पुन्हा एकदा अस्तिर झाला, सुंदरला आठव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय अवास्तव होता, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे.
'वॉशिंग्टन सुंदर हा आठव्या क्रमांकाचा बॅटर नाही. जर त्याला मागच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं, तर त्याला इकडे चौथ्या क्रमांकावर पाठवता आलं असतं. स्पेशलिस्ट बॅटरना खेळवण्याऐवजी ऑलराऊंडरना खेळवल्यामुळे टीमवर वारंवार दबाव येत आहे, त्यामुळे सीरिजचा मार्ग बदलत आहे', अशी प्रतिक्रिया रवी शास्त्री यांनी दिली आहे.
