टीम इंडियाचे खेळाडू रांचीमध्ये एमएस धोनीची त्याच्या फार्महाऊसवर जाऊन भेट घेणार आहेत. धोनीच्या रांचीमधल्या फार्महाऊसमध्ये खेळाडूंसाठी पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. धोनीची भेट घेण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू पोहोचले आहेत, पण गंभीर रांचीमध्ये पोहोचला नाही.
धोनी-गंभीर वाद
याआधीही धोनी आणि गंभीरमध्ये वाद असल्याचं वृत्त अनेकदा प्रसिद्ध झालं होतं. 2011 वर्ल्ड कप विजयानंतर गंभीरने अनेकदा अप्रत्यक्षपणे टीका केली होती. 2011 चा वर्ल्ड कप फक्त एका सिक्समुळे जिंकलो नाही, तर संपूर्ण टीमने केलेल्या कामगिरीमुळे भारताला वर्ल्ड कप जिंकता आला, असं मत गंभीरने अनेकदा व्यक्त केलं आहे. गंभीरची ही वक्तव्य म्हणजे धोनीवर निशाणा असल्याचं बोललं गेलं.
गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. गुवाहाटीमध्ये पराभव झाल्यानंतर स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी गौतम गंभीरच्या विरोधात घोषणा दिल्या. तसंच गंभीरला पदावरून काढून टाकावं, अशी मागणीही केली. दरम्यान गौतम गंभीरलाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा आपल्या पदाबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल, मी टीमपेक्षा मोठा नाही, पण मी कोच असताना भारताने इंग्लंडमध्ये सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली, तसंच टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्याचंही गंभीरने स्पष्ट केलं.
