जालना : भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इसरोने 16 जानेवारी रोजी दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी केल्याचं जाहीर केलं. दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करणारा भारत हा अमेरिका चीन आणि रशियानंतर केवळ चौथा देश ठरला आहे. ही किमया साध्य केल्यानंतर भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक अवकाशात निर्माण करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर विविध अंतराळ मोहिमांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. अवकाशामध्ये दोन उपग्रहांची जोडणी करणे म्हणजे नक्की काय? याचा भारताला भविष्यात काय फायदा होईल? याबाबत आम्ही खगोल अभ्यासक सुरेश केसापूरकर यांच्याकडून माहिती घेतली.
advertisement
इस्रोने आखलेल्या या मोहिमेचे नाव spadex असं होतं. दोन उपग्रहांची एकमेकांशी जोडणी करण्याला डोकिंग असे म्हणतात तर दोन उपग्रह एकमेकांपासून विलग करण्याला अनडॉकिंग असं म्हटलं जातं. 30 डिसेंबरला पीएसएलव्ही सी 16 या रॉकेटच्या साह्याने आपण हे उपग्रह अवकाशात सोडले. हे दोन उपग्रह 475 किमी अंतरावर वेगात पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते.
लोकांनी हिणवलं, पण तिनं व्रत सोडलं नाही, मुंबईतल्या ‘ॲनिमल मॉम’ची कहाणी
या दोन उपग्रहांना नंतर एकाच कक्षेत आणण्यात आलं. यानंतर या दोन उपग्रहांमधील अंतर कमी कमी करण्यात आलं. सर्वात शेवटी पंधरा मीटर आणि त्यानंतर तीन मीटर अंतरावर हे उपग्रह आणण्यात आले. यानंतर हे दोन्ही उपग्रह एकमेकांशी जोडण्यात आले. अतिशय किचकट आणि कौशल्यपूर्ण अशी मोहीम इस्रोने यशस्वी केली आहे.
अवकाश संशोधनात या तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होणार आहे. चंद्रावरून माती खडक इत्यादींचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होईल. भारताला स्वतःचं अवकाश स्थानक निर्माण करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. 2040 मध्ये भारतीय नागरिक चंद्रावर उतरणार आहे. त्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. भारताचं आगामी लक्ष असलेल्या गगन यान मोहिमेसाठी देखील डोकिंग तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असं खगोल अभ्यासक सुरेश केसापूरकर यांनी सांगितलं. अवकाश संशोधनात होत असलेली संशोधने व राबविण्यात येत असलेल्या मोहिमा याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील मोठा उपयोग होत असल्याचं केसापूरकर यांनी सांगितलं.





