एआय तंत्रज्ञानामुळे महामार्गावरील मृत्यूचे तांडव थांबणार
भीषण अपघातांवर आळा घालण्यासाठी गृह विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरु करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अपघातप्रवण ठिकाणी म्हणजेच ब्लॅक स्पॉट्सवर एआयच्या माध्यमातून 24 तास नजर ठेवली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. विशेषतहा तीव्र उतार, वळणाचे रस्ते आणि वेग नियंत्रण नसलेल्या भागात एआयच्या मदतीने वाहनांचा वेग नियंत्रित केला जाईल. संभाव्य अपघात होण्यापूर्वीच चालकांना इशारा दिला जाणार आहे.
advertisement
मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे महामार्गांचा समावेश
मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे या महामार्गांवरील ठाणे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सवर ही यंत्रणा विशेष लक्ष ठेवणार आहे. महामार्गावरील वाहतुकीचा रिअल-टाइम डेटा थेट महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पोहोचणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीची माहिती तातडीने मिळू शकणार आहे.
या प्रणालीमुळे जखमींना गोल्डन अवर मध्ये वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल आणि वाहतूक अधिक सुरळीत राहील. आयटीएमएसमध्ये कॅमेरे, सेन्सर्स आणि डेटा सेंटर एकमेकांशी जोडले जात असून वाहतुकीचा वेग, घनता आणि वाहनांची हालचाल यावर सातत्याने लक्ष ठेवले जाते.
