नेमकं घडलं काय?
दोन सख्या बहिणी आईला भेटण्यासाठी कल्याणहून ठाण्याकडे जात होत्या. जास्त सामान असल्याने त्यांनी दोन ओला कार बुक केल्या. पहिली कार आल्यावर मोठ्या बहिणीने लहान बहिणीला काही सामानासह त्यात बसवले. चालकाला ओटीपी दिला आणि त्याच दरम्यान दुसरी कार आल्याने ती उरलेले सामान ठेवण्यात गुंतली.
तासाचा प्रवास मिनिटांत, बदलापुरात गेमचेंजर प्लॅन, पूर्व-पश्चिम प्रवास होणार सोपा
advertisement
मोठी बहीण सामान ठेवण्याच्या गडबडीत असतानाच पहिली कार निघून गेली. काही वेळाने मोठ्या बहिणीने चालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे ती घाबरली आणि जवळपास दीड तास संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. ती रडू लागली आणि परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली.
112 हेल्पलाईनवर संपर्क
शेवटी मोठ्या बहिणीने 112 हेल्पलाइनवर संपर्क साधला. माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी परिस्थितीची चौकशी सुरू केली. चालक फोन उचलत नसल्याने संशय अधिकच वाढला.
बहिणीला पाहताच डोळ्यात आनंदाश्रू
थोड्याच वेळात चालकाचा फोन आला आणि तो कळव्यापर्यंत पोहोचल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला तातडीने मुलीसह परत येण्याचे आदेश दिले. अखेर काही वेळाने कार परत आली आणि मुलगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. लहान बहिणीला सुखरूप पाहताच मोठ्या बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पोलिसांच्या जलद आणि योग्य कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला आणि कुटुंबाला दिलासा मिळाला.






