पालघर : विक्रमगड तालुक्यातील उटावली येथील आदर्श विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मयंक विष्णू कुवरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
मयंक हा नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी माळा पाडवी पाडा येथे जाण्यासाठी निघाला होता. शाळा ते घर हे अंतर चार किलोमीटरचा असून तो पायी जंगलाजवळील वाटेने जात होता. पायी जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याचा हल्ला थेट त्याच्या दप्तरावर झाला. अचानक झालेल्या हल्ल्याने मयंक घाबरला आणि आरडाओरड केला.त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने प्रसंगावधान राखत बिबट्यावर दगड फेकले.
advertisement
मुलांच्या गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांची हालचाल लक्षात येताच बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र या हल्ल्यात मयंकच्या शरीरावर नखांनी जखमा झाल्या आहेत.
जखमी मयंकला तातडीने विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून जखमांवर टाके घातल्याची माहिती दिली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन
या घटनेपूर्वीही गाव परिसरात बिबट्या दिसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपासून गावकऱ्यांमध्ये बिबट्याच्या वावराबाबत चर्चा सुरू होती. समाजमाध्यमांवर बिबट्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. नागरिकांना एकमेकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने दखल घेत परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
जंगलाच्या मार्गाने जाताने घोळक्याने जावे तसेच रात्रीच्या वेळी जंगल परिसर टाळावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट कायम असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
