कोळी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची. श्रीचे वडील सुरक्षा रक्षक तर आई परवडेल ते मिळेल तसे काम करून घर चालवतात. अशा परिस्थितीत शिक्षण थांबवून श्रीने घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आपला वेळ, श्रम आणि स्वप्ने जुळवून घेतली. मित्र साहिलच्या मोमोज स्टॉलवर काम करून त्याने घरात आधार निर्माण केला. त्याच्या कर्तृत्वामुळे आणि कामसू स्वभावामुळे कुटुंबाला नव्याने उमेद मिळत होती.
advertisement
‘जिमला जातो म्हणून सांगितलं अन्..' ताम्हिणी घाट अपघातात ओमकारच्या मृत्यूने आजी ढसाढसा रडली
दरम्यान, मित्रमंडळींसोबत विरंगुळ्यासाठी कोकणात जाण्याचा कार्यक्रम ठरला. घरच्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. जाऊ नको, परिस्थिती बरी नाही असे म्हणत असताना, परंतु मित्रांच्या हट्टामुळे श्रीने अखेर घरच्यांचे म्हणणे न मानता कोकणाचा प्रवास ठरवला. त्यावेळी कोणीच कल्पना केली नव्हती की हा तात्पुरता विरंगुळा त्यांच्या आयुष्यभराचा शोक बनून परतेल.
अपघातानंतरची परिस्थिती अधिक हृदयद्रावक होती. जवळपास 500 फूट खोल दरीत थार कोसळल्याचे समोर येईपर्यंत दोन दिवस कुणालाच काहीच माहिती नव्हती. माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले आणि त्यानंतर घटनास्थळी सुरू झालेल्या शोधमोहिमेत सर्व सहा तरुण मृतावस्थेत सापडले. या बातमीने कोळी कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला.
श्रीची आजी तर पूर्णपणे कोसळली आहे. अश्रू पुसत-पुसत त्या म्हणाल्या, आमचा एकुलता एक नातू गेला. घरातून गेला तो पुन्हा परतणार नाही, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कुटुंबातील प्रत्येक जण हताश, पोकळ आणि अवाक् झाला आहे. आधार देण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत.
लहानपणापासून एकत्र वाढलेले सहा मित्र एकाच वेळेस मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्या मित्रपरिवारात आणि परिसरातही शोककळा पसरली आहे. अनेकांच्या डोळ्यात एकच प्रश्न काय चुकलं? तर अनेक पालकांना हा प्रसंग भविष्यात मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण करणारा ठरला आहे.
श्री जरी कुटुंबाचा आधार होता, तरी त्याची जागा आता कायमची रिकामी झाली आहे. घरातील चार भिंतींमध्ये त्याचा हसरा चेहरा, त्याचे स्वप्नाळू शब्द आणि त्याची धडपड आजही घरच्यांना भेडसावत आहेत. या अपघाताने केवळ एक कुटुंब नाही, तर समाजालाच जाग आणली आहे. जीवन किती अनिश्चित असते.
ताम्हिणी घाटातील हा अपघात जसा दुःखद आहे तितकाच धोकादायक रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्नही पुढे आणणारा आहे. पण कोळी कुटुंबासाठी कोणत्याही चर्चेपेक्षा मोठे दुःख म्हणजे त्यांचा श्री… जो गेलेला परत येणार नाही.





