प्रबळगड अर्थात कलावंतीण दुर्ग हा किल्ला माथेरान आणि पनवेलदरम्यान आहे. या किल्ल्यावर चढून गेल्यावर खूप लांबवर एक सुंदर दृश्य दिसतं. या किल्ल्यावरून मुंबईचा काही भागही दिसतो. उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटक मोठ्या संख्येनं येथे येत असतात. या किल्ल्याबद्दल अनेक कथाही प्रचलित आहेत. सूर्यास्तानंतर इथे भुतांचा वावर असतो, असं म्हटलं जाते. त्यामुळे लोक सूर्यास्तापूर्वी इथून निघून जातात.
advertisement
नेमका प्रकार काय आहे?
माथेरान आणि पनवेलदरम्यान असणारा प्रबळगड हा किल्ला भारतातल्या सर्वांत धोकादायक किल्ल्यांमध्ये गणला जातो. या किल्ल्याला ‘कलावंतीण किल्ला’ असंही म्हणतात. हा किल्ला 2300 फूट उंच टेकडीवर बांधलेला आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत असतात; पण ते सूर्यास्तापूर्वीच किल्ल्यावरून निघून जातात. सूर्यास्तानंतर इथे भयानक शांतता असते. या किल्ल्यावर जाण्यासाठी खडक कापून पायऱ्या केल्या आहेत. या पायऱ्या अतिशय धोकादायक असून त्यांना ना रेलिंग आहे ना दोरी. किल्ल्याच्या पायऱ्या चढताना अनेक जण पडून मृत्युमुखीदेखील पडले आहेत. पूर्वी या किल्ल्याचं नाव ‘मुरंजन किल्ला’ असं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचं नाव राणी कलावंतीच्या नावावरून ‘कलावंतीण दुर्ग’ असं पडलं. बहामनी सल्तनतच्या काळात पनवेल आणि कल्याण किल्ल्याचं निरीक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. 1458 मध्ये अहमदनगर सल्तनतीचा पंतप्रधान मलिक अहमद याने कोकण प्रांतात विजय मिळवला होता. तेव्हा त्याने हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे सूर्यास्तानंतर भूत-प्रेतं फिरत असल्याची कथा सांगण्यात येते.
दरम्यान, भारतातील बहुतांश ठिकाणांबाबत भुताटकीच्या कथा सांगण्यात येतात. अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु अशी ठिकाणं पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.
