पेट्रोल-डिझेलचं टेन्शनच नाही, पुणे-मुंबई महामार्गावर धावणार हायड्रोजन वाहने
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Green Hydrogen Vehicles: पुणे-मुंबई महामार्गावर लवकरच हायड्रोजन वाहने धावणार आहेत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मुंबई: भारत सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत वाहतूक क्षेत्रात मोठे पाऊल उचललं आहे. बस आणि ट्रकमध्ये हायड्रोजन इंधनाचा प्रयोग करण्यासाठी देशभरात पाच पथदर्शी (प्रायोगिक) प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांतर्गत पुणे-मुंबई महामार्गासह काही प्रमुख महामार्गांवर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी होणार आहे.
सरकारने या प्रयोगासाठी एकूण 37 बस आणि ट्रक निवडले असून त्यांच्यासाठी 9 हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. हा उपक्रम नवीनीकरणीय आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने राबवला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या या गाड्यांमुळे वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक इंधनाचा वापर कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.
प्रकल्पासाठी 208 कोटींचे अनुदान
या प्रयोगांसाठी सरकारने 208 कोटी रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे. या प्रकल्पांची 18 ते 24 महिन्यांसाठी चाचणी घेतली जाणार आहे. जर या चाचण्या यशस्वी झाल्या, तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने वापरण्यात येतील.
advertisement
वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती
ग्रीन हायड्रोजनचा वापर केल्याने जीवाश्म इंधन (डिझेल, पेट्रोल) कमी वापरले जाईल आणि वातावरणाला हानी पोहोचवणारे प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे वाहतूक क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आणि भविष्यकालीन मानले जात आहे. यासाठी सरकार हायड्रोजन रिफ्युएलिंग केंद्रे उभारणे आणि तंत्रज्ञान विकसित करणे यावर भर देत आहे.
advertisement
2047 पर्यंत ऊर्जा स्वावलंबनाचे लक्ष्य
भारत सरकारने 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्रात अक्षय ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. यामध्ये ग्रीन हायड्रोजनचा मोठा वाटा असणार आहे, कारण हा पर्यावरणपूरक इंधनाचा उत्तम पर्याय मानला जातो.
2030 पर्यंत मोठी गुंतवणूक आणि उत्पादन
भारत सरकारने 4 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले होते. या योजनेसाठी 19,744 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच, 2030 पर्यंत दरवर्षी 5 मिलियन मेट्रिक टन (MMT) ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय, 125 गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकल्पामुळे भारताला पर्यावरणपूरक वाहतुकीचा नवीन मार्ग सापडणार असून प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. भविष्यात ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर अधिक प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 11:58 AM IST