MPSC Exam: आरक्षणाचा गोंधळ मिटवा, मुख्य परीक्षा पुढे ढकला, उमेदवारांची मागणी
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील आरक्षणाचा गोंधळ मिटवून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘ईडब्ल्यूएस’ आणि ‘एसईबीसी’ आरक्षणाच्या तांत्रिक गोंधळावर स्पष्टता आणावी. तसेच मुख्य परीक्षेला पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केलीये. राज्यसेवा मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु, ही मुख्य परीक्षा किमान 15 दिवस पुढे ढकलावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
आरक्षणात तांत्रिक गोंधळ
राज्यसेवा मुख्य परीक्षा 26 ते 28 एप्रिल दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 7 हजार उमदेवार पात्र ठरले आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ 2 हजार उमेदरावांनीच अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित उमेदवार हे आरक्षणातील त्रुटीमुळे अर्ज करू शकलेले नाहीत. आरक्षणातील तांत्रिक गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत. त्यामुळे या गोंधळावर स्पष्टता यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
advertisement
पूर्व परीक्षेचा सुधारित निकाल
12 मार्च रोजी जाहीर झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालात प्रवर्गाबाबत त्रुटी आढळून आला. त्यानंतर आयोगाने 29 मार्च रोजी सुधारित निकाल प्रसिद्ध केला. या सुधारित निकालाच्या आधारे आणखी 318 उमेदवारांना पात्रता मिळाली.
उमेदवारांची मागणी काय?
‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून ‘एसईबीसी’मध्ये, तसेच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून ‘ओबीसी’मध्ये अर्ज करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मात्र, एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये प्रवर्ग बदलण्याची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षा जवळ आली तरीही उमेदवार अर्ज करू शकलेले नाहीत.
advertisement
दरम्यान, लोकप्रतिनिधींनी देखील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आयोगाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही दाद दिली जात नाही. आयोगाने ‘ईडब्ल्यूएस ते एसईबीसी’ लिंक तातडीने सुरु करावी. तसेच राज्य सेवेची ही शेवटची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा असल्याने अधिक संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 09, 2025 9:44 AM IST







