प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत, पोलिसांसमोर मुलांनी वाचला बापाच्या कृत्याचा पाढा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
15 वर्षांपूर्वी या दोघांनी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवून प्रेमविवाह केला होता. सुरुवातीपासूनच तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून अखेर...
पप्पू पाण्डेय, प्रतिनिधी
सुलतानपूर, 14 ऑगस्ट : प्रेमविवाह कधीही भारी, निदान आपण एकमेकांना आधीपासून ओळखत असतो, असं अनेकजणांना वाटतं. मात्र लग्न कोणत्याही पद्धतीने झालं तरी माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं फार महत्त्वाचं असतं, तरच त्या संसाराला अर्थ असतो. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इतर कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून एका नवऱ्याने मुलांसमोर बायकोचा गळा दाबून हत्या केली. 15 वर्षांपूर्वी या दोघांनी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवून प्रेमविवाह केला होता. त्यांची दोन्ही मुलं आता आईविना पोरकी झाली आहेत, तर नराधम बापाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सेऊर गावाजवळील पूर्वांचल महामार्गावर घडलं. उन्नाव जिल्ह्यातील सफीपूरचा रहिवासी असलेला राहुल मिश्रा हा आपली बायको मोनिका गुप्ता आणि दोन मुलांना घेऊन इनोव्हा कारने लखनऊहून रायबरेलीला आपल्या सासरवाडी निघाला होता. मात्र रायबरेलीला न जाता त्याने पूर्वांचल महामार्गावर रस्त्याशेजारी गाडी उभी केली. नराधमाने दोन्ही मुलांसमोरच बायकोचा गळा आवळला. तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहासोबत तो मुलांना घेऊन गाडीतच बसून राहिला. मुलं प्रचंड घाबरली होती.
advertisement
महामार्गावर गस्त घालणाऱ्या पथकाने रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही गाडी पाहिली आणि तिचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल आतून दरवाजे उघडत नव्हता. गाडी रस्त्याशेजारी उभी आहे, आत लोक बसले आहेत, दरवाजा उघडण्यास तयार नाहीत, याबाबत शंका येताच पथकाने पोलिसांना माहिती दिली. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जबरदस्तीने गाडीचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच बाहेर आलेला मोनिकाचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले. तेव्हा आत बसलेल्या 12 वर्षीय मुलीने आणि 5 वर्षीय मुलाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं. आता मोनिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
advertisement
मोनिकाच्या कुटुंबीयांनी याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. ते म्हणाले, 2008 साली मोनिकाने राहुलशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीपासूनच राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून कायमच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण व्हायचं. मात्र आम्ही असा कधी विचारही केला नव्हता की, राहुल मोनिकाची हत्या करेल. दरम्यान, पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे राहुलवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Location :
Sultanpur,Uttar Pradesh
First Published :
August 14, 2023 8:42 AM IST