सेवाग्राम आश्रमात आजही पाळले जातात गांधीजींचे नियम, पाहा कसं असतं जेवण?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला जगभरातून लोक भेट देतात. त्यांना या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार जेवण दिलं जातं.
वर्धा, 28 सप्टेंबर: महात्मा गांधी यांच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाची सातासमुद्रपार ओळख आहे. त्या ठिकाणी जगभरातील पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांना महाराष्ट्रातील शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणाचा आस्वाद देण्याचं काम आश्रम प्रतिष्ठानचं आहार केंद्र करतं. आहार केंद्रातील अस्सल वैदर्भीय ग्रामीण आणि पारंपारिक पदार्थांनी सजलेली थाळी पर्यटकांना आकर्षित करते. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या परंपरेनुसार किंवा त्यांच्या विचारांनुसारच येथील आहार केंद्र सुरू आहे.
आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आश्रण प्रतिष्ठाननं आहार केंद्र सुरू केलं. आश्रमासमोर असलेल्या आहार केंद्रात घरगुती पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेणं पर्यटक पसंत करतात. आहार केंद्रात प्रवेश करताच येथील स्वच्छ सुंदर परिसर दिसतो. जेवणासाठी टेबल खुर्ची किंवा पारंपरिक पद्धतीने खाली बसून जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
advertisement
परिसरातील लोकांना रोजगार
महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे ग्रामीण रोजगार किंवा ग्रामीण विकासाला चालना दिली. महात्मा गांधी यांच्या विचारांना अनुसरूनच सेवाग्राम गावातीलच लोकांना ज्या ठिकाणी रोजगार मिळाला. 2018 मध्ये सुरू झालेल्या आहार केंद्रात सेवाग्राम परिसरातीलच काही हातांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. सेवाग्राम येथील या आहार केंद्राच्या स्वयंपाक घरात ग्रामीण महिला स्वयंपाक बनवतात. तर सेवाग्राम परिसरातीलच काही तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
advertisement
मातीच्या माठातून पाणी
सेवाग्राम येथील या आहार केंद्रात पारंपरिक पद्धतीने जेवण जेवत असताना ग्रामीण भागातील फ्रीज अशी ओळख असलेल्या मातीच्या माठातूनच थंडगार पाणी पिणे पर्यटक पसंत करतात. मातीच्या माठातील पाणी पिणे शरीरासाठी ही चांगले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी मातीची माठ वापरले गेले आहेत. आहार केंद्राच्या बाजूला राहण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सहजच सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
advertisement
परंपरा जपण्याचा होईल प्रयत्न
सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आजही कायम आहे. त्यामुळे महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरूनच आहार केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही एक प्रेरणा मिळते. भविष्यातही जेवणाची ग्रामीण परंपरा कायम ठेवण्याचे व्रत आहार केंद्र जपणार असल्याचं आहार केंद्राचे संचालक सचिन हिडे यांनी सांगितलं.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 28, 2023 11:47 AM IST