Health Tips : गहू अन् तांदळात रसायनांचा वापर करताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
रसायनांचा चुकीचा वापर केल्याने गंभीर अपघात आणि जीवितहानी घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
पुणे : अनेक घरांमध्ये गहू, तांदूळ, कडधान्ये, मसाले इत्यादी वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून नागरिक कीडनाशक पावडर किंवा गोळ्यांचा वापर करतात. मात्र, या रसायनांचा चुकीचा वापर केल्याने गंभीर अपघात आणि जीवितहानी घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये अशा गोळ्यांमुळे निर्माण झालेल्या विषारी वायूंच्या संपर्कात आल्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याने या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. सचिन पवार यांनी दिली.
घरात ठेवलेल्या धान्याच्या डब्यांमध्ये बोरिक पावडर किंवा सेल्फॉस सारख्या कीडनाशक गोळ्या वापरल्या जातात. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या या गोळ्या हवाबंद डब्यात ठेवल्या गेल्यानंतर रासायनिक क्रिया होऊन त्यातून घातक गॅस तयार होतो. हा गॅस जर डबा उघडताना बाहेर पसरला, तर त्याचा श्वास घेतल्याने शरीरात विष पसरू शकते आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
सेल्फॉस अत्यंत धोकादायक रसायन
सेल्फॉसमध्ये अॅल्युमिनियम फॉस्फाईड हा अत्यंत विषारी घटक असतो. त्याचा वापर केवळ प्रशिक्षित कृषी किंवा पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. हा पदार्थ ओलावा किंवा हवेच्या संपर्कात आल्यास फॉस्फिन गॅस तयार करतो. या गॅसचा श्वास घेतल्यास डोकेदुखी, उलटी, चक्कर, श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात. तत्काळ वैद्यकीय उपचार न घेतल्यास विषबाधेमुळे मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
अशा घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
घरगुती वापरासाठी रासायनिक कीडनाशके पूर्णपणे टाळावीत. जर वापर करावाच लागला तर गॅस तयार झाल्यानंतर किमान काही मिनिटे तो भाग पूर्णपणे हवेशीर ठेवावा. डब्यांवर झाकण घट्ट ठेवण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने धान्य सुकवून कोरडे करावे. धान्य ठेवताना स्टील किंवा प्लास्टिकऐवजी हवेशीर भांड्यांचा वापर करावा. धान्य वेळोवेळी उन्हात काढून ठेवल्याने त्यात कीड होण्याची शक्यता कमी होते. डॉक्टर सचिन पवार यांनी सांगितले की, अशा रसायनांमुळे तयार होणारा गॅस अत्यंत जीवघेणा असतो. घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी तो अधिक घातक ठरू शकतो. त्यामुळे कीडनाशकांचा वापर शक्यतो टाळावा आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा."
advertisement
धान्य सुरक्षित ठेवण्याचे नैसर्गिक उपाय
धान्य नीट सुकवून, स्वच्छ आणि हवेशीर डब्यांमध्ये ठेवावे. नीमाची पाने, हिंग, लवंग किंवा कोरडी मिरची यांच्या वासामुळे कीड लागणे टळते. या पारंपरिक पद्धती वापरल्यास धान्य टिकून राहते आणि आरोग्याला कोणताही धोका निर्माण होत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : गहू अन् तांदळात रसायनांचा वापर करताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम