शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल! नव्याने 'या' २ तालुक्यातील १६ गावांचा समावेश, कसा असणार मार्ग?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आधी निश्चित करण्यात आलेल्या मार्गाला विविध जिल्ह्यांतून तीव्र विरोध झाल्यानंतर शासन स्तरावर पर्यायी मार्गांवर विचार सुरू झाला असून, त्यानुसार हा महामार्ग आता सोलापूर जिल्ह्यातून थेट सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी प्रत्यक्षात मार्ग बदलासंदर्भातील हालचाली वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूरऐवजी साताऱ्यातून जाणार महामार्ग
आधीच्या आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून सांगलीकडे जाणार होता. मात्र, आता हा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील गारवड परिसरातून सातारा जिल्ह्यातील कारखेल गावाकडे वळवण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे सोलापूरऐवजी सातारा जिल्ह्याला या महामार्गाचा थेट लाभ मिळणार आहे. विशेषतः साताऱ्यातील माण आणि खटाव या तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
माण व खटाव तालुक्यांतील १६ गावांचा समावेश
नव्या प्रस्तावित मार्गानुसार शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सुमारे १० आणि खटाव तालुक्यातील ६ अशा एकूण १६ गावांच्या हद्दीतून जाणार आहे. या गावांमधून महामार्ग गेल्यास या भागातील दळणवळण अधिक सुलभ होईल, तसेच विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकरी आणि नागरिकांची भूमिका काय राहते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
तीर्थक्षेत्रांना मिळणार थेट जोडणी
या मार्ग बदलामुळे माण तालुक्यातील प्रसिद्ध शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे शक्तिपीठ महामार्गाशी थेट जोडली जाणार आहेत. त्यामुळे भाविकांसाठी प्रवास अधिक सोपा होणार असून, धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा अंदाज आहे. या भागातील लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
मायणीनंतर सांगली जिल्ह्यात प्रवेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा महामार्ग पडळ परिसरानंतर मायणीच्या आसपासून पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात हा मार्ग जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान होईल, तसेच दोन्ही जिल्ह्यांतील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळू शकते.
विरोधामुळे मार्गात बदल
शक्तिपीठ महामार्गाची मूळ संकल्पना वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन कोकणातील पत्रादेवीपर्यंत जाण्याची होती. सुमारे ८०२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार होता. मात्र, सांगली, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांतून या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. जमीन संपादन, पर्यावरण आणि स्थानिक शेतीवर होणाऱ्या परिणामांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने महामार्गाच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 9:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल! नव्याने 'या' २ तालुक्यातील १६ गावांचा समावेश, कसा असणार मार्ग?










