Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणार पाहुण्यांचं आगमन! पण, पर्यावरण मंत्रालयाने घातल्या अटी, वाचा कारण
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचं अस्तित्व आहे पण, त्यांची संख्या स्थिर नाही.
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे. या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून अनुक्रमे 3 व 5 वाघ स्थलांतरीत केले जाणार आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढावी यासाठी राज्यातील इतर ठिकाणांहून काही वाघ स्थलांतरित केले जावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बेन क्लेमेंट यांनी याला दुजोरा दिला आहे.
advertisement
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या डोंगर रांगांमध्ये पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा तुलनेने राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्प मानला जातो. या ठिकाणी वाघांचं अस्तित्व आहे. पण, त्यांची संख्या स्थिर नाही. शिकार प्रजातींची उपलब्धता, दाट जंगल व योग्य अधिवास असतानाही वाघांची हालचाल मर्यादित राहिली आहे. मात्र, आता 8 नवीन वाघ या ठिकाणी येणार असल्याने संख्या हळूहळू वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, स्थलांतरसाठी निवडलेल्या वाघांना पकडणे आणि स्थलांतर प्रक्रियेदरम्यान कमीत-कमी त्रास होईल याची काळजी घ्यावी. योग्य पशुवैद्यकीय सेवेला हाताशी धरून राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पाडणे बंधनाकारक आहे. याशिवाय स्थलांतरानंतर सतत देखरेख ठेवून तिमाही अहवाल केंद्राला सादर करणे बंधनकारक असेल. कोणताही अनर्थ घडल्यास परवानगी मागे घेतली जाईल, असंही या आदेशात नमूद केलं आहे.
advertisement
जैवविविधतेला मिळेल चालना
ताडोबा आणि पेंच हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे व्याघ्र पकल्प आहे. याठिकाणी वाघांचा अधिवास मोठा आणि संख्या जास्त आहे. येथून स्थलांतरित होणारे वाघ सह्याद्रीत नवीन जीवनक्षेत्र निर्माण करतील. यामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेला चालना मिळेल. सह्याद्रीत वाघ वाढले तर संपूर्ण सह्याद्री घाटाला पर्यावरणीय व पर्यटनदृष्ट्या नवे महत्त्व प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया व्याघ्र अभ्यासकांनी दिली आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 12, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणार पाहुण्यांचं आगमन! पण, पर्यावरण मंत्रालयाने घातल्या अटी, वाचा कारण