Amravati Mumbai Flight: खराब हवामानाचा फटका, अमरावती-मुंबई विमानसेवेबाबत मोठा निर्णय, वेळापत्रकही बदललं
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Amravati Mumbai Flight: अमरावती-मुंबई विमानसेवेला खराब हवामानाचा फटका बसत आहे. 1 ते 15 डिसेंबर विमानसेवा बंद राहिली होती. आता पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे.
अमरावती: ढगाळ वातावरण, दाट धुके आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे अमरावती-मुंबई विमानसेवेवर मोठा परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दृश्यमानतेच्या समस्यांमुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती-मुंबई-अमरावती ही विमानसेवा आठवड्यातून केवळ दोनच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवसांनाच ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
हवामानातील अनिश्चिततेमुळे यापूर्वी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत अमरावती-मुंबई विमानसेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता सेवा पुन्हा सुरू करत असताना कंपनीने वारंवार होणाऱ्या धुक्याचा आणि ढगाळ वातावरणाचा विचार करून उड्डाणांच्या वेळेत बदल केला आहे.
advertisement
अमरावती-मुंबई विमानसेवा नवीन वेळापत्रक
नव्या वेळापत्रकानुसार अमरावती विमानतळावरून विमान दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि सायंकाळी 4 वाजता मुंबई विमानतळावर उतरेल. तर मुंबईहून दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी उड्डाण करून विमान दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी अमरावती विमानतळावर पोहोचेल.
अमरावती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुके यामुळे दृश्यमानता कमी होत आहे. याच कारणामुळे विमानसेवेत मर्यादा आणाव्या लागत आहेत. प्रवाशांनी काही काळ संयम बाळगून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे.
advertisement
दरम्यान, अमरावतीकर प्रवाशांना मुंबईसाठी असलेली थेट विमानसेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस उपलब्ध राहणार असल्याने व्यावसायिक, शासकीय आणि वैयक्तिक प्रवास करणाऱ्यांना पर्यायी नियोजन करावे लागणार आहे. हवामान सुधारल्यास विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati Mumbai Flight: खराब हवामानाचा फटका, अमरावती-मुंबई विमानसेवेबाबत मोठा निर्णय, वेळापत्रकही बदललं









